रणबीर कपूर आणि आलिया भट्ट सध्या त्यांचा आगमी चित्रपट ‘ब्रह्मास्त्र’सोबतच त्यांच्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत आहेत. सोशल मीडियावर सातत्यानं त्यांच्या लग्नाच्या चर्चा होताना दिसत आहेत. या दोघांच्या लग्नासाठी त्यांचे चाहतेही फार उत्सुक असल्याचं पाहायला मिळत आहेत. एवढंच नाही तर हे दोघंही एप्रिल किंवा मे महिन्यात लग्न करतील असंही मागच्या काही दिवसांपासून बोललं जात आहे. अशात आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत रणबीर कपूरन लग्नाच्या चर्चांवर मौन सोडलं.

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांनी २०१८ मध्ये एकमेकांना डेट करायला सुरुवात केली होती. त्यावेळी त्यांनी ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटासाठी काम करायला सुरुवात केली होती. त्यानंतर अलिकडेच या दोघांनी वाराणसीमध्ये चित्रपटचं अखेरचं शूटिंग पूर्ण केलं. तब्बल ५ वर्षांनंतर या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण झालं. हा चित्रपट ९ सप्टेंबर २०२२ ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आणि यानिमित्तानं आलिया- रणबीर पहिल्यांदाच सिल्व्हर स्क्रिनवर एकत्र दिसणार आहेत. दरम्यान चित्रपट प्रदर्शित होण्याआधी आलिया आणि रणबीर लग्नाच्या बेडीत अडकणार अशी चर्चा सुरू आहे.

नुकतंच NDTV ला दिलेल्या मुलाखतीत रणबीर कपूरला लग्नाबाबत काही प्रश्न विचारण्यात आले आणि त्यानं त्याची उत्तरंही दिली. मात्र जेव्हा त्याला लग्नाच्या तारखेबद्दल प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा तो म्हणाला, ‘मला वेडा कुत्रा चावलेला नाहीये जे मी लग्नाची तारीख सर्वांना आत्ता सांगू. पण मी आणि आलिया लवकरच लग्न करणार आहोत.’ मात्र लवकरच म्हणजे नेमकं कधी याचा खुलासा मात्र त्यानं अद्याप केलेला नाही.

दरम्यान मागच्या महिन्यात काही रिपोर्ट्सनी असा दावा केला होता की, आलिया आणि रणबीर कपूर एप्रिल महिन्यात लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. हा एक खासगी विवाहसोहळा असणार आहे आणि यात केवळ आलिया- रणबीरचे कुटुंबीय आणि जवळचे नातेवाईक तसेच मित्रपरिवार उपस्थित असणार आहे. याशिवाय रणबीर कपूरची आत्या रिमा जैन यांनी रणबीर आणि आलिया लवकरच लग्न करणार आहे असं एका मुलाखतीत सांगितलं होतं मात्र ते लग्न कधी करणार याचा खुलासा त्यांनी केला नव्हता.