बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतो. रणवीर सिंग आणि त्याची पत्नी दीपिका पदुकोण बॉलिवूडच्या लोकप्रिय जोड्यांपैकी एक मानले जातात. सोशल मीडियावरही या दोघांचं अनेकदा कौतुक होताना दिसतं तसेच त्यांचा पोस्ट देखील व्हायरल होताना दिसतात. पण त्यासोबतच या दोघांना अनेकदा सोशल मीडियावर ट्रोल देखील केलं जातं. हे दोघंही नेहमीच अशा टीकेला उत्तर देणं टाळतात. पण नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये यावर रणवीरनं भाष्य केलं आहे.

नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत रणवीर सिंगनं सोशल मीडियावर सातत्यानं होणाऱ्या ट्रोलिंगवर भाष्य करताना टीकाकारांना सडेतोड उत्तरही दिलं आहे. रणवीर म्हणाला, “ते लोक आम्हाला ट्रोल करतात ज्याच्या आयुष्यात कोणत्यातरी गोष्टी अपूर्ण राहिल्या आहेत. असं म्हटलं जातं की जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीमध्ये सतत चुका शोधता किंवा त्याला नकारात्मक बोलता तेव्हा तुमची ही कृती तुमचे विचार कसे आहेत ते दर्शवते. तुम्ही कोणत्या प्रकारची व्यक्ती आहात हे दाखवून देते. हे सर्व त्या लोकांबद्दल असतं. त्यांनी केलेली टीका ही मी किंवा माझ्या पत्नीबद्दल कधीच नसते. जेव्हा अशी टीका केली जाते तेव्हा ती मला नेहमीच निराधार वाटते.”

आणखी वाचा- Video: सुहाना खानच्या डेब्यू चित्रपटाचा टीझर प्रदर्शित, अमिताभ बच्चन यांनी शेअर केली खास पोस्ट

रणवीर पुढे म्हणाला, “मला किंवा दीपिकाला यावर स्पष्टीकरण देण्याची गरज कधीच वाटली नाही. कारण आम्हाला दोघांनाही माहीत असतं की सत्य काय आहे. मी मला जमेल तेवढ्या गोष्टी चांगल्या करण्याचा प्रयत्न करतो आणि माझा चांगुलपणावर विश्वास आहे. दिवसा अखेर मला स्वतःबद्दल माझ्या पत्नीबद्दल सत्य माहीत असतं एवढंच माझ्यासाठी पुरेसं आहे.”

आणखी वाचा- “मी त्याच्यावर नेहमीच प्रेम केलं…” जेव्हा सोहेल खानबद्दल बोलली होती सीमा सचदेवा

रणवीर सिंगच्या कामाबद्दल बोलायचं तर त्याचा ‘जयेशभाई जोरदार’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री शालिनी पांडेय मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळताना दिसत आहे. याशिवाय आगामी काळात त्याच्याकडे बरेच चित्रपट आहेत.