गूढ आणि थराराने परिपूर्ण अशी 'रात्रीस खेळ चाले' या मालिकेचा दुसरा सिझन चांगलाच गाजतोय. यातल्या भूमिकांनीसुद्धा प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. मालिकेतील अण्णांची भूमिका साकारणारे अभिनेते माधव अभ्यंकर यांनी फारच मेहनत घेतली आहे. या मालिकेत परत एका महत्त्वपूर्ण भूमिकेत येण्यासाठी त्यांनी काय काय केलं हे जाणून घेऊयात.. 'रात्रीस खेळ चाले'च्या पहिल्या सिझनमध्ये अण्णांची भूमिका फार छोटी होती. निर्मात्यांच्या आग्रहाखातर ही भूमिका केल्याचं ते सांगतात. पण आता दुसऱ्या सिझनमध्ये ते प्रमुख भूमिकेत आहेत. ही भूमिका साकारणं म्हणजे खूप मोठं आव्हान होतं, असंही ते म्हणाले. 'टाइम्स ऑफ इंडिया'ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितलं, की अण्णांच्या भूमिकेसाठी एका महिन्यात त्यांनी सात ते आठ किलो वजन कमी केलं होतं. यादरम्यान त्यांनी कडक डाएट प्लॅन आखला होता. तर मालवणी भाषेबद्दल ते म्हणाले, 'माझी काकू गावी कणकवलीत मालवणी भाषेत बोलायची. त्यामुळे ती भाषा मी चांगलीच ऐकून होतो. पण बरीच वर्षे पुण्यात राहिल्याने मला ती भाषा व्यवस्थित बोलता येत नव्हती. त्यामुळे जवळपास एक महिनाभर मला त्या भाषेचा सराव करावा लागला. त्यासाठी मी ऑनलाइन मालवणी नाटकं पाहायचो.' ऑनस्क्रीन अण्णांच्या भूमिकेपेक्षा ऑफस्क्रीन माधव हे पूर्णपणे वेगळे असल्याचं ते सांगतात. 'मी खऱ्या आयुष्यात माझ्या भूमिकेच्या एकदम विरोधात आहे. मी भावनिक व्यक्ती आहे. अण्णांना नाती जपता येत नाहीत पण खऱ्या आयुष्यात माझ्यासाठी नाती फार महत्त्वाची आहेत.' पहिल्या एपिसोडपासूनच माधव यांना अण्णांच्या भूमिकेसाठी कौतुकाची थाप तर काही टीकाटिप्पणीसुद्धा मिळाली. पण एका अडीच वर्षाच्या मुलाने त्यांना 'रॉकिंग अण्णा' असं नाव दिलं होतं आणि त्या मुलाचं हे नावं माधव यांना फारच आवडलं होतं. आजही सेटवर लहान मुलं माझ्यासोबत आवडीने सेल्फी काढतात, पण मोठी माणसं अनेकदा माझ्या ऑनस्क्रीन भूमिकेच्या दरारामुळे जवळ यायला घाबरतात, असं त्यांनी सांगितलं.