बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. रवीनाने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. रवीना फक्त तिच्या अभिनयासाठीच नाही तर तिच्या बेधडकपणे बोलण्यासाठी ही ती ओळखली जाते. सध्या रवीना ही तिच्या आगामी 'आरण्यक' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. यात रविनाने पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. त्यामुळे ती सध्या चर्चेत आहे. नुकतंच तिने एका वेबसाईटला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने आरण्यक चित्रपटाबद्दल अनेक खुलासे केले. यावेळी तिला ओटीटी प्लॅटफॉर्मवर काम करण्याच्या अनुभवाबद्दलचा प्रश्न विचारला. त्यावर ती म्हणाली, "मला निश्चितपणे ओटीटी प्लॅटफॉर्मवर काम करायचे होते. मला ते नेहमीच एक मनोरंजक माध्यम वाटले. या उत्कृष्ट प्रकल्पाचा भाग मला व्हायचे होते." "त्यात अशा अनेक गोष्टी होत्या ज्यामुळे मला नाही म्हणायला वाव नव्हता. मला एक असा शो करायचा होता ज्यात काही संदेश असावा. विशेष म्हणजे सिप्पी फिल्म्समधून मी करिअरची सुरुवात केली. यानंतर ३० वर्षांनी पुन्हा मी सिप्पी फिल्म्सद्वारे ओटीटीवर पदार्पण करत आहे," असे देखील ती म्हणाली. हेही वाचा : ‘टिप टिप बरसा पानी’ गाण्याच्या रिमेकमध्ये कतरिनाला पाहून रवीना म्हणाली… "या चित्रपटात तू पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहेस. मग तुला कसे वाटतंय?" असा प्रश्न रवीनाला मुलाखतीदरम्यान विचारण्यात आला होता. तेव्हा ती म्हणाली, "मला पोलीस अधिकाऱ्याची भूमिका मिळाली ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. पोलिसात भरती होणे हे माझे लहानपणापासून स्वप्न होते." "आरण्यक'मधली कस्तुरी डोगरा ही व्यक्तिरेखा खूप उत्कृष्ट, प्रतिभावान आहे. त्यासोबतच ती एक आईदेखील आहे. ती मुंबईचा पोलिसांचा भाग नाही. ती एका पर्वत क्षेत्रातील पोलिसांचा भाग आहे. ती निर्भयी आणि कठोर असण्यासोबतच फार शांत आहे. तिला तिच्या करिअरमध्ये जे काही मिळवायचे आहे त्यासाठी ती लढत असते. कस्तुरीसारख्या किती महिला पोलीस अधिकारी आहेत, ज्या घर आणि नोकरीचा समतोल साधतात. त्यामुळे त्या सर्वजणी माझ्या पात्राशी जोडली जातात," असेही रविना म्हणाली.