बॉलीवूडमधील मस्तमौला अभिनेता अशीच रणवीरची ओळख आहे. नेहमी वावरताना सतत हसून-खेळून राहणारा, टिवल्याबावल्या करणारा, मजामस्ती करणारा रणवीर प्रत्यक्षात तेवढा उथळ नाही. त्याला बॉलीवूडमध्ये अभिनेता म्हणून आपलं एक स्थान निर्माण करायची घाई आहे हे तो लपवून ठेवत नाही. कदाचित दीपिका पदुकोणवरील प्रेमामुळे असेल त्याला स्वत:ला हरहुन्नरी, अष्टपैलू अभिनेता म्हणून सिद्ध करायचं आहे आणि त्यासाठी विचारपूर्वक तो चित्रपट निवडतो. एवढेच नाही तर आलेल्या चांगल्या संधीवर तुटून पडायचं आणि सर्वस्व ओतून ते काम करायचं हा त्याचा मूळ स्वभाव असला तरी त्याच्या सततच्या गमत्या हरकतींमुळे त्याची ‘दीवाना-मस्ताना’ अशीच प्रतिमा पाहणाऱ्याच्या मनात उमटते. ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटानंतर मात्र आपल्याबद्दलची ही प्रतिमा बदलणार आणि हरहुन्नरी अभिनेत्याची नवी ओळख कायम होणार, असा विश्वास त्याला वाटतो आहे.

सध्या कुठल्याही क्षेत्रातील तरुण पिढीला ‘अरे! तुला या क्षेत्रात उडी मारायची आहे. जा लेको, मार उडी, इथे अशी संकटे येतील, तिथे हा महागुरू भेटेल, ही संधी मिळाली तर पुढे जाशील, नाहीतर तुझं काही खरं नाही बाबा..’ असे सल्ले दिले जाऊ शकत नाहीत, दिले जात नाहीत. याचं कारण आपल्याला काय हवं आहे हे ठरवूनच त्यांनी उडय़ा घेतलेल्या असतात किंबहुना, ‘संधी’ या शब्दाचा नेमका अर्थ उलगडलेली ही पिढी चटकन स्थिरावते आणि स्थिरावल्यावर नेमकं कुठे पोहोचायचं आहे हे समोरच्याला सांगायला बिलकुल कचरत नाही. ‘बँड बाजा बरात’ ते ‘बाजीराव मस्तानी’ हे अंतर गेल्या पाच वर्षांत कापणारा रणवीर सिंग हा या तरुण पिढीचा नेमका प्रतिनिधी आहे. बॉलीवूडचा नावाजलेला अभिनेता हा शिक्का त्याच्यावर बसला आहे, पण ‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटापासून अष्टपैलू अभिनेता हीच आपली ओळख असायला हवी.. असे विश्वासाने सांगणारा रणवीर आपली पुढची दिशा अगदी स्पष्ट सांगतो.

रणवीर सिंग हा बॉलीवूडमधील अगदी ‘वेगळा’ किंवा स्पष्ट भाषेत बोलायचं तर ‘विचित्र’ अभिनेता आहे. कारण तो बॉलीवूडमधील प्रतिष्ठित नटांप्रमाणे कोणतीच गोष्ट चौकटीत राहून करत नाही. तो कुठल्याही कार्यक्रमात असेल त्याचे कपडे इतरांपेक्षा अगदी वेगळे असतात, तो कधी सरळ ‘हॅलो..’ वगैरे करत नाही. तो त्याच्या वयाच्या कलाकारांची थेट गळाभेट घेतो, मनातलं जाहीर बोलायला तो कधी घाबरत नाही, सतत सळसळत्या ऊर्जेने भरलेल्या रणवीरच्या नेहमीच्या वागण्यातील गोष्टीही इंडस्ट्रीत ‘विचित्र’ याच नावाने ओळखल्या जातात. या सगळ्याची कल्पना असलेल्या रणवीरच्या लेखी त्या गोष्टी बहुधा अस्तित्वातच नसाव्यात. मला असंच बोलायला आवडतं, मला अशाच गोष्टी करायला आवडतात.. तुला हेच वाटतंय ना. हा जो मोबाइल आहे माझ्या हातात तो केवळ ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपट प्रदर्शित होईपर्यंत असणार आहे. त्यानंतर मी २१ दिवसांसाठी जो गायब होईन तो यांना कोणालाही सापडणार नाही, अशी सुरुवात केल्यानंतरही तुझ्यासारखा बॉलीवूडचा कलाकार हे करू शकेल? हा माझा प्रश्न कायम होता.

‘हे मी केलं आहे’, तो सांगतो. ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटाच्या पूर्वतयारीपासून ते चित्रीकरणाच्या शेवटच्या दिवसापर्यंत मी माझ्या घरच्यांशीही बोललेलो नाही. हा मोबाइल पूर्ण बंद होता त्यावेळी.. माझ्यासाठी ते खरंच खूप शांत आणि सुंदर दिवस होते, असं त्याने सांगितलं खरं.. मात्र तेव्हा त्याच्या स्वभावातील हा विरोधाभास जरा जास्तच जाणवला. म्हणजे पार्टी आणि मित्रांमध्ये रमणारा हाच रणवीर सिंग आहे जो मोबाइल पूर्ण बंद ठेवून केवळ बाजीरावाच्या भूमिकेतच रमला होता. (सेटवर आपल्याला ‘बाजीराव’ याच नावाने हाक मारली जावी असा नियमच त्याने सगळ्यांना घातला होता आणि चुकून जरी कोणी हा नियम मोडला तर त्याची खैर नसायची..ही गोष्ट अर्थात रणवीरने नाही दीपिकाने सांगितली आहे). ‘बाजीराव मस्तानी’ हा चित्रपट माझ्यासाठी काय आहे? काय असेल? याची पूर्ण कल्पना मला पहिल्यापासून होती. राजेरजवाडय़ांच्या भूमिका साकारणं हे प्रत्येक कलाकाराचं स्वप्न असतं. त्यातही बाजीरावसारखा शूर योद्धा साकारायची संधी लाखात एकाला मिळते. हिंदी चित्रपटात फारशी कोणाच्या वाटय़ाला ती आलेली नाही. त्यामुळे संजय लीला भन्साळींनी जेव्हा मला याची कल्पना दिली तेव्हा मी उडालो होतो, असं रणवीर म्हणतो. हा चित्रपट केवळ अभिनेता म्हणून महत्त्वाकांक्षी भूमिका एवढाच आपल्यासाठी तो मर्यादित नव्हता तर भन्साळींसारख्या दिग्दर्शकाने गेली कित्येक र्वष उरात जपलेलं ते स्वप्न होतं आणि ते पूर्ण करायचं अशी दुहेरी जबाबदारी आपल्यावर होती, असं रणवीरचं म्हणणं आहे.

आयुष्यात आलेली ही ‘सुवर्णसंधी’ या अर्थाने आपण झपाटून ‘बाजीराव’ आपलासा   केला आहे, असं तो सांगतो. हां म्हणजे या चित्रपटासाठी भन्साळींनी आम्हाला पूर्ण बाजीरावाची व्यक्तिरेखा कशी असेल, कशी दिसेल, कशी वागेल, हे सगळं लिहून दिलं होतं आणि मला तयारी करायची होती असं लोकांना वाटू शके ल. प्रत्यक्षात, या चित्रपटासाठी पूर्णपणे वेगळ्या पद्धतीने तयारी केली गेल्याचं रणवीरने सांगितलं. भन्साळींच्या मनात ‘बाजीराव-मस्तानी’ या दोन व्यक्तिरेखा आणि त्यांच्या प्रेमाची कथा घट्ट रुजलेली होती. चित्रपटासाठी त्यांनी ‘राऊ’ या कादंबरीचा आधार घेतला होता. संदर्भ म्हणून काही मूळ चित्रे, छायाचित्रे होती आणि बऱ्याच साऱ्या ऐकीव, लिखित गोष्टी होत्या. अभ्यासातून ‘राऊ’ हे शूरवीरतेचं, रोखठोक वृत्तीचं, हुशारीचं एक अजब रसायन होतं, हे मला समजलं होतं. तरीही बाजीराव चालेल कसा? त्याचे हावभाव कसे असतील, तो एखाद्या  गोष्टीवर व्यक्त कसा होत असेल, असे कितीतरी बारीकसारीक तपशील माझे मला शोधायचे होते. त्यासाठी चित्रीकरणाच्याही आधी २१ दिवस मी एकटाच या सगळ्या संदर्भग्रंथांसह स्वत:ची तयारी करत होतो, असं रणवीरने सांगितलं. ‘राऊ’सारखे कसदार शरीर कमावण्यासाठी कसरत करणं, अ‍ॅक्शन दृश्यांसाठीची तयारी हा नित्याचा भाग सोडला तर रोजच्या रोज मराठी शिकणं, सेटवर सतत मराठी बोलणं, अशा पद्धतीने आयुष्य ‘बाजीराव’मय झाल्याचं तो म्हणतो. मराठी भाषा मला पहिल्यापासून समजते. रोज बोलून बोलून ती इतकी आवडायला लागली की संवाद बोलत असताना कित्येकदा मराठी शब्द सहज वापरले जायचे असं सांगणाऱ्या रणवीरने आपल्या मराठी बोलण्याची भन्साळींनीही धास्ती घेतली होती, असं गमतीने सांगितलं. तुला शक्य झालं तर तू माझा चित्रपट मराठीतच पूर्ण करशील. तेव्हा आवर स्वत:ला.. अशी तंबीही भन्साळींनी दिली होती, अशी आठवण तो सांगतो.

रणवीरने यावर्षी दोन चित्रपटात काम केलं. झोया अख्तर दिग्दर्शित ‘दिल धडकने दो’ या चित्रपटात त्याने कबीरची भूमिका केली होती. भावा-बहिणीच्या नात्यावर आधारित या चित्रपटातील कबीर ही अगदी आत्ताच्या तरुणांचे प्रतिनिधित्व करणारी भूमिका होती आणि रणवीरचा हा कबीर कित्येकांना आवडून गेला. आणि आता वर्ष संपता संपता थेट ‘बाजीराव मस्तानी.’ कबीरची भूमिका मस्त होती, असं तो म्हणतो. वरवर ती भूमिका साकारणं सहजसोपं वाटेल, पण ते तसं नसतं. रोजच्या जगण्यातली विसंगती भूमिकेतून प्रेक्षकांना जेव्हा आपलीशी जाणवते तेव्हा त्यावर खरी पसंतीची मोहोर उमटते. त्यामुळे ‘कबीर’ ते ‘बाजीराव’ या दोन व्यक्तिरेखांमधील जे अंतर आहे ते मी एक अभिनेता म्हणून सहज कापू शकतो.

वर्षभरात दोन असे टोकाचे चित्रपट करताना कलाकार म्हणून माझ्यातील अष्टपैलुत्व लोकांसमोर यावं आणि तीच माझी ओळख व्हावी, ही आपली महत्त्वाकांक्षा असल्याचं तो ठामपणे आणि विश्वासाने सांगतो. आपल्या मजेशीर, खिलाडू स्वभावामुळे या गोष्टी लोकांच्या लक्षात आल्या असतील की नाही हे माहिती नाही. पण मी विक्रमचा ‘लुटेरा’ केला त्याच वर्षी भन्साळींचा ‘राम लीला’ केला. आणि नंतर ऐंशीच्या दशकातील कथा सांगणारा ‘गुंडे’ केला. ‘गुंडे’चे चित्रीकरण संपता संपताच ‘बाजीराव मस्तानी’ची सुरुवात झाली होती. त्याच्या या छोटय़ा कारकिर्दीच्या धावत्या आढाव्यावरून त्याला कलाकार म्हणून आपल्यातला हरहुन्नरीपणा योग्य त्या ठिकाणी पोहोचवायचा होता, याची जाणीव त्याने सहज गप्पांमध्ये करून दिली. २०१० ‘बँड बाजा बरात’ ही रणवीर सिंग नामक युवकाची बॉलीवूडमधील सुरुवात होती. २०१५ सरता सरता हा अभिनेता ‘बाजीराव’ म्हणून लोकांसमोर आला आहे. इथून पुढे बॉलीवूडचा हा ‘बाजीराव’ याच वेगाने धावणार आहे..