झी मराठीवरील ‘सा रे ग म प’ लिटील चॅम्प या शोमुळे अनेक नवोदित गायकांचे भविष्य घडले. या शोमुळे महाराष्ट्राला नाजूक सुरांची मेजवानी अनुभवता आली. झी मराठीचा ‘सा रे ग म प’ हा अनेकांच्या स्वप्नपूर्तीचा मंच आहे असे म्हटले तर खोटे ठरणार नाही. या मंचाने आजवर अनेक उत्तमोत्तम गायक, गायिका, संगीतकार या मोनोरंजन क्षेत्राला दिले आहेत. सध्या सुरु असलेल्या सा रे ग म प लिटील चॅम्पचा महाअंतिम सोहळा लवकरच पार पडणार आहे. त्यापूर्वी लिटिल चॅम्प्सने मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. पंचरत्नांचे योग्य मार्गदर्शन, मृण्मयी देशपांडे खुमासदार सूत्रसंचालन आणि १४ लिटिल चॅम्प्सचे धमाकेदार परफॉर्मन्सेस यामुळे सारेगमप लिटिल चॅम्प्सच हे नवीन पर्व गाजले. अगदी सुरुवातीपासूनच प्रेक्षकांनी या पर्वाला पसंती दर्शवली. या १४ स्पर्धकांचा प्रवास प्रेक्षकांनी पाहिला. या १४ अप्रतिम गाणाऱ्या स्पर्धकांमध्ये कोण वरचढ आहे हा निर्णय घेणे पंचरत्नांसाठी सुद्धा कठीण होते.आणखी वाचा : अरे मंत्री साहेब कसे आहात आपण?; अभिजीत बिचुकलेची बिग बॉस १५च्या घरात एण्ट्री ही स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आली असून, पलाक्षी दीक्षित, ओंकार कानेटकर, गौरी गोसावी, प्रज्योत गुंडाळे, सारंग भालके, रीत नारंग आणि स्वरा जोशी हे सात स्पर्धक महाअंतिम सोहळ्यात एकमेकांशी स्पर्धा करणार आहेत. हे सातही स्पर्धक प्रेक्षकांचे लाडके आहेत. त्यामुळे त्यांच्यामध्ये कोण विजेता ठरणार हे सांगणे खूपच अवघड आहे. महाअंतिम सोहोळ्याआधी या ७ ही जणांनी मनसे प्रमुख राजसाहेब ठाकरे यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. हे स्पर्धक राजसाहेबांना भेटून खूप भारावून गेले. राज ठाकरेंनी या मुलांना इलेक्ट्रिक तानपुरा आणि तबला भेट दिला. यावेळी राज ठाकरेंनी त्यांच्या लहानपणीच्या आठवणींना उजाळा दिला.