बॉलिवूडमध्ये ‘चक दे इंडिया’ या हिट चित्रपटाद्वारे पदार्पणातच लक्ष वेधून घेण्यात यशस्वी झालेली मराठमोळी अभिनेत्री सागरिका घाटगे पुन्हा एका मराठी चित्रपटामुळे लाइमलाईटमध्ये आली आहे. हिंदीसोबतच मराठीतही अभिनय करणारी सागरिका ‘डाव’ या आगामी चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीत पुनरागमन करत आहे. ‘प्रेमाची गोष्ट’ या चित्रपटानंतर ‘डाव’ हा सागरिकाचा दुसरा मराठी चित्रपट आहे.

वाचा : वडिलोपार्जित घरावर ताबा मिळवण्यासाठी शर्मिला टागोर यांनी दाखल केली तक्रार

नितीन उपाध्याय यांनी ऑडबॉल मोशन पिक्चर्सच्या बॅनरखाली ‘डाव’ची निर्मिती केली असून, कनिष्क वर्मा यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. या सस्पेंस-थ्रिलरपटाची कथा-पटकथा कनिष्क वर्मा यांनीच लिहिली आहे. संवाद योगेश मार्कंडे यांनी लिहिले आहेत तर मंगेश धाकडे यांचे पार्श्वसंगीत या चित्रपटाला लाभले आहे. मराठी चित्रपट रसिकांना ‘सायको किलिंग’चा अनुभव देणाऱ्या ‘डाव’मध्ये सागरिकाने मुख्य भूमिका साकारली असून, आजवर साकारलेल्या व्यक्तिरेखांपेक्षा या चित्रपटातील भूमिका खूपच वेगळी आहे. इतर जॉनरच्या चित्रपटांच्या तुलनेत मराठीमध्ये थ्रिलरपटांची संख्या फार कमी असून, ‘डाव’ हा चित्रपट त्यांची उणीव नक्की भरून काढणारा असेल असे सागरिकाला वाटते.

वाचा : प्रार्थना बेहरेच्या होणाऱ्या नवऱ्याबद्दल या गोष्टी माहितीयेत का?

आशयघन कथानक, अर्थपूर्ण संवादलेखन, सहजसुंदर अभिनय, प्रसंगानुरूप पार्श्वसंगीत आणि त्याला साजेसं सादरीकरण या सर्वांचा मिलाफ घडवणारा ‘डाव’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.