मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय गाजलेला चित्रपट म्हणजे ‘सैराट.’ नागराज मंजुळे दिग्दर्शित या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले होते. या चित्रपटातील अर्ची, परश्या, बाळ्या, सल्या या सर्वच पात्रांनी प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली. आता या चित्रपटातील दोन कलाकार ‘मन झालं बाजिंद’ या मालिकेत महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. पण हे कलाकार कोण आहेत हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

‘सैराट’ या चित्रपटात पारश्याची पुरेपूर साथ देणारे त्याचे दोन मित्र बाळ्या आणि सल्या यांच्या लक्षवेधी भूमिका प्रेक्षक अजूनही विसरले नाहीत. सल्या ही भूमिका अभिनेता अरबाजने साकराली होती तर बाळ्या ही भूमिका अभिनेता तानाजीने साकारली होती. हीच जोडी आता छोट्या पडद्यावर झळकणार आहे. ‘मन झालं बाजिंद’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

आणखी वाचा : ‘बाजिंद’ म्हणजे काय?; उभ्या महाराष्ट्राला पडलाय प्रश्न, पाहा Google ची आकडेवारी

‘मन झालं बाजिंद’ या मालिकेत पहिल्यांदाच राया आणि कृष्णाच्या प्रेमकथेत पिवळ्या रंगाची उधळण आपल्याला पहायला मिळणार आहे. पिवळा रंग हे बुद्धीचं प्रतीक. हा मांगल्याचा, समृद्धीचा रंग आहे. आपल्या संस्कृतीमध्ये पिवळ्या रंगाच्या हळदीला मान असतो. आत्मविश्वासनिर्माण करणारा हा रंग आपलं मनसुद्धा पवित्र करतो. या पिवळ्या रंगाच्या साक्षीने राया-कृष्णाची प्रेमकहाणी फुलणार आहे. कृष्णा आणि राया सोबत आता बाळ्या आणि साल्या देखील प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज होणार आहेत. या मालिकेतून अभिनेता वैभव चव्हाण आणि अभिनेत्री श्वेता राजन हे दोघे पहिल्यांदाच मुख्य भूमिकेतून प्रेक्षकांना भेटणार आहेत. या मालिकेचे दिग्दर्शन अनिकेत साने यांनी केले आहे.