सैराटसारख्या यशस्वी चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलेला बाळ्या म्हणजेच अभिनेता तानाजी गालगुंडे आता मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. झी मराठीवरील ‘मन झालं बाजींद’ या मालिकेत तानाजी मुंज्याची व्यक्तिरेखा साकारत आहे. विशेष म्हणजे अल्पावधीच ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या पसंतीस आली आहे. तानाजी हा पहिल्यांदाच मालिका विश्वात काम करत आहे. त्याबद्दलचा अनुभव सांगताना तानाजी म्हणाला, ‘मालिके मध्ये काम करण्याचा अनुभव खूपच वेगळा आहे. हे माध्यम मुळातच खूप वेगवान आहे. या माध्यमातून आपण खूप कमी वेळात जास्त लोकांपर्यंत पोहोचतो. माध्यम वेगवान तसे कामही वेगवान आहे. सध्या हा वेग मला अंगवळणी पडताना काहीसे कठीण जात आहे, पण मालिकेचा सर्व चमू खूपच प्रोत्साहन देणारा आहे. त्यामुळे ते मला सांभाळून घेतात. चित्रपटात काम करताना आपल्याकडे खूप वेळ असतो. महिनाभर आधी संहिता मिळते, मग त्यावर चर्चा होते, पण इथे तसे नसते, इथे संहिता हातात आली की लगेच चित्रीकरणाला उभे राहायचे असते,’ ‘मुंज्या या माझ्या व्यक्तिरेखेसाठी प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मला मिळत आहे. मुंज्याला पाहताना प्रेक्षकांना खूप मजा येते. मुंज्याच्या पात्रात असणारा निरागसपणा, त्याचा होणारा गोंधळ आणि त्याच्या क्रिया-प्रतिक्रिया पाहून प्रेक्षकांना आनंद मिळतो,’ असे त्याने व्यक्तिरेखेला मिळणाऱ्या प्रतिसादाबद्दल सांगितले.