‘संजू’ चित्रपट प्रदर्शित होऊन एक महिना पूर्ण झाला आहे. महिना उलटून गेला असला तरी बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाची यशस्वी घौडदौड सुरू आहे. राजकुमार हिरानी दिग्दर्शित हा चित्रपट सर्वाधिक कमाई करणारा भारतातला चौथा चित्रपट ठरला आहे. बॉलिवूडचा वादग्रस्त अभिनेता संजय दत्तच्या आयुष्यावर हा चित्रपट आधारलेला आहे. ‘संजू’वादात सापडला असला तरी प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद याला लाभला. या चित्रपटानं ३३९. ७५ कोटींचा यशस्वी गल्ला जमवत सलमानच्या ‘टायगर झिंदा है’ चित्रपटाला मात दिली आहे.

सलमानच्या ‘टायगर झिंदा है’ या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर ३३९. १६ कोटींची कमाई केली होती. हा रेकॉर्ड मोडणं रणबीरच्या चित्रपटला अशक्य असल्याचं मानलं जात होतं मात्र रणबीरनं ‘टायगर’वर मात करत यशस्वी कमाई केली आहे. अल्पावधितच या चित्रपटानं २५० कोटींचा गल्ला पार केला होता त्यानंतर चित्रपट सलमानचा रेकॉर्ड मोडतो का याकडे सगळ्यांचं लक्ष लागून होतं. अखेर ३२ दिवसांनंतरही ‘संजू’ बॉलिवूडच्या मैदानात आपलं अधिराज्य गाजवण्यास यशस्वी झाला.

‘संजू’ आधी ‘बाहूबली २’ या चित्रपटानं सर्वाधिक विक्रमी कमाई केली. या चित्रपटानं ५१० कोटींचा गल्ला जमावला. अमिरच्या ‘दंगल’नं बॉक्स ऑफिसवर ३८७ कोटींची यशस्वी कमाई केली. तर राजकुमार हिरानी यांच्या ‘पिके’ नं ३४०. ८ कोटींची कमाई केली. सलमानच्या ‘टायगर झिंदा है’ चित्रपटाचा रेकॉर्ड मोडल्यानंतर आता ‘संजू’ ‘पिके’ चा रेकॉर्ड मोडेल का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.