अभिनेत्री सारा अली खाननं केदारनाथ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. मागच्या काही वर्षांमध्ये सारानं ४ चित्रपटांमध्ये केलं आहे. आता तिचा ‘अतरंगी रे’ हा पाचवा चित्रपट येत्या २४ डिसेंबरला ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात सारा, अभिनेता अक्षय कुमार आणि धनुष यांसारख्या सुपरस्टार कलाकारांसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.

सारानं फार कमी कालावधीत बॉलिवूडमधील मोठ्या कलाकारांसोबत काम केलं आहे. त्यामुळे तिच्यासोबतच बॉलिवूड पदार्पण केलेल्या जान्हवी कपूर आणि अनन्या पांडे या अभिनेत्रींच्या तुलनेत आपल्या करिअरमध्ये ती खूपच पुढे गेली आहे. अशात आता नुकत्याच एका मुलाखतीत सारानं, जान्हवी आणि अनन्याला आपण स्पर्धक मानत नाही असं वक्तव्य करत त्यासोबतच त्याचं कारणही सांगितलं आहे.

आरजे सिद्धार्थ कननला दिलेल्या मुलाखतीत सारा म्हणाली, ‘मी माझ्या जागेवर आरामात आहे तर मग मला असुरक्षित का वाटायला हवं. आम्हा सर्वांमध्ये स्पर्धा नक्कीच आहे. मात्र आम्ही सर्व एकमेकांच्या चांगल्या मैत्रिणी आहोत आणि आमचं बॉन्डिंग एवढं चांगलं आहे की कामातील स्पर्धेचा त्यावर काहीच फरक पडणार नाही. स्पर्धा असली तरीही जर तुम्हाला तुमच्यावर विश्वास असेल, तुम्ही सत्याच्या रस्त्यावर चालत असाल तर तुमच्यासाठी कोणतीही गोष्ट अशक्य नाही.’

सारा अली खान आणि जान्हवी कपूर यांच्यात चांगली मैत्री आहे. काही महिन्यांपूर्वीच या दोघींचे केदारनाथ येथील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या दोघींनी केदारनाथ दर्शन केलं होतं. याशिवाय या दोघीही सोशल मीडियावरही एकमेकींच्या फोटोंवरही कमेंट करताना दिसतात.