मुंबई : वैविध्यपूर्ण विषयांवर आधारित मालिका साकारणाऱ्या सन मराठी वाहिनीवर २१ एप्रिलपासून दररोज सायंकाळी ७ वाजता ‘हुकुमाची राणी ही’ मालिका प्रसारित होणार आहे. या मालिकेतील नायक – नायिकेची गोष्ट कारखान्यातून सुरू होते आणि हाच धागा पकडून मालिकेची पत्रकार परिषद सातारा येथील कारखान्यात नुकतीच पार पडली. यावेळी पत्रकारांनीही कारखान्याची सफर करून कामगारांचे जीवन अनुभवले. अनेकदा मालिकांमध्ये कार्यालय आणि कारखाना या ठिकाणांसाठी सेट उभारला जातो. पण या मालिकेचे चित्रीकरण साताऱ्यामधील खऱ्या कारखान्यात पार पडणार आहे. त्यामुळे कलाकारांनाही एक वेगळा अनुभव घेता येणार आहे.
‘हुकुमाची राणी ही’ मालिकेत अभिनेत्री वैभवी चव्हाण हिने राणीची भूमिका, तर अक्षय पाटील इंद्रजीतची भूमिका साकारत आहे. या दोघांबरोबरच अभिनेत्री अंकिता पनवेलकर, अभिनेते राहुल मेहंदळेंसह इतर कलाकारही मालिकेत महत्त्वाच्या भूमिका साकारत आहेत. मालिकेत राहुल मेहंदळे हे जयसिंगराव महाडिक या महत्त्वपूर्ण भूमिकेत पाहायला मिळणार आहेत.
साताऱ्यातील कारखान्यात पार पडलेल्या पत्रकार परिषदेत मालिकेच्या निर्मात्या अभिनेत्री श्वेता शिंदे म्हणाल्या की, ‘मालिकाविश्वात पहिल्यांदाच खऱ्या कारखान्यात ‘हुकुमाची राणी ही’ मालिकेचे चित्रीकरण करण्यात येत आहे. हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आम्ही उचलले आहे. तसेच इंद्रजीत व राणीची नवी गोष्ट प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवायला सज्ज झाली आहे. या मालिकेसाठी माझ्या आईचा कारखाना प्रेरणास्थान आहे. महाडिक इंडस्ट्रीमध्ये जशी राणी आहे, अगदी तशीच राणी आमच्या कारखान्यात पण होती आणि त्या राणीला पाहूनच ही गोष्ट सुचली. या मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन होईल, तसेच माणुसकी जपण्याचा सल्लाही मिळणार आहे. प्रेक्षकांनी मालिकेच्या प्रोमोवर जसा प्रेमाचा वर्षाव केला, त्याप्रमाणे मालिकेवरही प्रेक्षक भरभरून प्रेम करतील अशी खात्री आहे’.
महाडिक इंडस्ट्रीचे सर्वेसर्वा जयसिंगराव महाडिक सेवानिवृत्त झाल्यानंतर महाडिक इंडस्ट्रीचा कारभार त्यांच्या मुलाकडे सुपूर्द करण्यात येतो. जयसिंगरावच हा निर्णय घेतात. कारखान्यातील बदललेल्या घडामोडींनंतर राणीचा महाडिक इंडस्ट्रीमध्ये प्रवेश होतो. आता माणुसकी जपणारी राणी व माणुसकीपेक्षा पैशाला महत्त्व देणारा इंद्रजीत समोरासमोर येणार तेव्हा नक्की काय होणार ? हे ‘हुकुमाची राणी ही’ मालिकेतून पाहणे रंजक ठरणार आहे. नेमक्या कोणत्या कारखान्यात मालिकेची चित्रीकरण होणार याबाबत प्रेक्षकांमध्येही उत्सूकता आहे.