रेश्मा राईकवार
साय-फाय चित्रपट वा आत्ताच्या काळात हॉलीवूडपटांमध्ये किंबहुना माव्‍‌र्हलपटांमधून प्रसिद्ध झालेल्या एकाच वेळी अनेक ठिकाणी असलेले विश्वाचे अस्तित्व आणि तत्सम कल्पनांवर आधारित चित्रपट आपल्याकडे फारसे बनवले जात नाहीत. त्यामुळे इथेही रिमेकचाच आधार घ्यावा लागतो. पण अशापद्धतीचे रिमेक बनवताना आपल्या मातीतील कथा वाटावी, इतके साधम्र्य साधणारे रूपांतरण करणे जड जाते. अनुराग कश्यप दिग्दर्शित ‘दोबारा’ हा चित्रपटही त्याला अपवाद नाही.

‘दोबारा’ हा स्पॅनिश चित्रपट ‘मिराज’चा रिमेक आहे. ज्या सहजतेने तिथे एकाच वेळी एकसारख्या भासणाऱ्या वेगवेगळय़ा विश्वात घडणाऱ्या कथा स्वीकारल्या जातात. त्या आपल्याकडे तितक्या पटकन प्रेक्षकांना रुचत नाहीत. किमान अशा पद्धतीने चित्रपट घडवताना सुरुवातीलाच काही प्रमाणात प्रेक्षकांची त्या पद्धतीने तयारी करून घेणे आवश्यक असते. इथे मात्र तसे होत नाही. दिग्दर्शक अनूराग कश्यप असल्याने चित्रण किंवा तंत्रणातली सफाई यात आहे. ‘दोबारा’ हा शब्द इथे दिग्दर्शकाने दोन अर्थानी वापरला आहे. दोबारा म्हणजे पुन्हा पुन्हा घडणारी घटना आणि दोन वाजून बारा मिनिटांनी घडणारी घटना असे दोन संदर्भ या कथेत आहेत. अंतरा आणि अनय या दोन व्यक्तिरेखांभोवती चित्रपटातील घटना घडत जातात. अंतरा एका रुग्णालयात परिचारिका म्हणून काम करते आहे. तिची लहान मुलगी आणि हॉटेलमध्ये प्रमुख सुरक्षारक्षक म्हणून काम करत असलेला पती विकास अवस्थी यांच्याबरोबर अंतरा एका नव्या घरात राहायला येते. या घरात अचानक सापडलेला एक जुना टीव्ही आणि त्याला जोडलेला व्हिडीओ कॅमेरा यामुळे अंतरा त्याच घरात काही वर्षांपूर्वी राहात असलेल्या अनयशी जोडली जाते. अनयची गोष्ट माहिती असलेली अंतरा पुन्हा एकदा टीव्ही सुरू करते आणि तिच्या आयुष्याचा क्रमच बदलून जातो, अशी या चित्रपटाची सर्वसाधारण कथा आहे.

साय-फाय कथेलाही कुठेतरी तर्काच्या कसोटीवर झगडावं लागतं. जे घडलं आहे ते का आणि जे पुढे घडणार आहे ते कसं, या प्रश्नांची उत्तरं दिल्याशिवाय जे दाखवलं जातं आहे ते पटणं अवघड असतं. किंवा मग ते पटवून घ्यावं लागतं. इथेही अंतरा आणि अनयबरोबर जेव्हा विचित्र घटना घडतात तेव्हा पृथ्वीवर आलेल्या चुंबकीय वादळाचा संदर्भ दिला जातो. आपल्याला तो अनेकदा अंतरा गाडी चालवत असताना रेडिओवर वा समोर सुरू असलेल्या टीव्हीवर ऐकू येत असतो. मात्र या वादळाचा आणि अंतराच्या आयुष्यातील बदललेल्या कालचक्राचा संबंध काय? हे कुठेही उलगडत नाही. केवळ एकदा अशाप्रकारच्या चुंबकीय वादळामुळे अंतरा कुठेतरी अनयच्या विश्वात आणि अनय पुन्हा अंतराच्या विश्वात ढवळाढवळ करत आहेत किंवा त्यांना एकमेकांशी संवाद साधता येतो आहे हे तुम्हाला मान्य करावं लागतं. मग ते एकदा मान्य केलंत की समोर घडणारी गोष्ट हत्येची असो, अपहरणाची असो वा फसवणाऱ्या नवऱ्याची असो.. त्यात काहीच फरक पडत नाही. जो गोंधळ सुरू केला आहे तो कसा संपणार हे पाहणं फक्त आपल्या हातात उरतं. अनुराग कश्यपसारखा अनुभवी दिग्दर्शक असूनही रिमेकच्या बाबतीत केवळ इथलं तिथे चिकटवण्याचा प्रयत्न झाला आहे हे पटणारे नाही. मात्र त्यामुळेच क्षमता असूनही या चित्रपटाची कथा मनाचा ठाव घेण्यात अपयशी ठरते.

चित्रपटाच्या कथेप्रमाणेच त्याचे चित्रण ज्या पद्धतीने झाले आहे तेही थोडेसे रंगमंचीय पद्धतीचे वाटत राहते. ठरावीक सेट्सच्या बाहेर चित्रपट जात नाही. अंतराचं घर, अभिषेकचं घर, अंतरा जिथे काम करते ते रुग्णालय इतक्याच मर्यादित जागेत कथा इथून तिथे घडत राहते. काळाचे संदर्भ या चित्रपटात फार महत्त्वाचे आहेत. आत्ताच्या काळातली घटना आणि ऐंशी-नव्वदच्या दशकातील घटना केवळ त्यावेळच्या चित्रपटांचे संदर्भ वापरून पुरेशी होत नाही. किंबहूना, कालचक्रात झालेला बदल दाखवताना त्यानुसार अनेक गोष्टींचे तपशीलवार चित्रण अपेक्षित असते. मात्र तसेही काही होत नाही.

अभिनयाच्या बाबतीत तापसी पन्नू आणि लहानग्या अनयच्या भूमिकेतील कलाकार वगळता फारसे कोणी लक्ष वेधून घेत नाहीत. नाही म्हणायला तापसी आणि पावेल गुलाटी ही जोडी ‘थप्पड’नंतर या चित्रपटात एकत्र आली आहे. मात्र त्यांच्यात धड प्रेमकथाही नसल्याने इथे ते एकत्र असूनही त्यांची किमया पडद्यावर रंगत नाही. राहुल भट्ट हा कलाकार खूप काळाने चित्रपटात दिसला आहे, मात्र त्याला करण्यासारखे फारसे काही नाही. दोन वेगवेगळय़ा विश्वात आणि वेगवेगळय़ा कालचक्रातील व्यक्ती, एका घटनेमुळे त्या एकत्र येतात. त्यांचं एकत्र येणं किती भावनिक, एकमेकांशी घट्ट बांधलेलं असू शकतं हे पाहणं खूप औत्सुक्याचं ठरलं असतं. या चित्रपटात नाही म्हणायला अंतरा आणि तिच्या मुलीचं असलेलं नातं मात्र दिग्दर्शकाने शेवटपर्यंत घट्ट धरून ठेवलं आहे. त्यामुळे एका आईचा विचित्र संघर्ष म्हणून हा चित्रपट पाहिला तर कदाचित एकदा का होईना असा काही साय-फायपट तेही हिंदीत पाहिल्याचं समाधान वगैरे काही वाटू शकेल..
दोबारा – दिग्दर्शक – अनुराग कश्यप, कलाकार – तापसी पन्नू, पावेल गुलाटी, राहुल भट्ट, नासर.