गेल्या काही दिवसांत देशातील असहिष्णुतेचा निषेध म्हणून चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवरांकडून पुरस्कार परत केले गेले आहेत. मात्र, चित्रपटसृष्टीतील काही कलाकारांनी याविषयी पुरस्कार परत न करण्याची भूमिका स्पष्ट केली आहे.
एका पत्रकार परिषदेत आपण राष्ट्रीय पुरस्कार परत करणार नसल्याचे ठामपणे बोलत कमल हसन म्हणाले की, मी असं नाही करणार. तो माझा अधिकार आहे. पुरस्कार परत करणा-यांनी सहनशील असण्याची गरज आहे. पुरस्कार परत करून काहीही होणार नाही. उलट, तुम्ही त्यामुळे सरकारचा आणि ज्यांनी तुम्हाला पुरस्कार दिले आहेत त्यांचा अपमान करत आहात. तर दुसरीकडे द डर्टी पिक्चरसाठी राष्ट्रीय पुरस्कार पटकाविणा-या अभिनेत्री विद्या बालनने म्हटलेले की, मी केलेल्या सर्वोत्कृष्ट कामासाठी देशाकडून माझा सन्मान करण्यात आलेला असल्यामुळे मी पुरस्कार परत करणार नाही. हा सन्मान मला देशाने दिला आहे सरकारने नाही. त्यामुळे तो मला परत करण्याची इच्छा नाही. आपल्या ५० व्या वाढदिवशी अभिनेता शाहरुख खाननेही प्रतिकात्मकरित्या निषेध व्यक्त करण्यासाठी मी पुरस्कार परत करू शकतो असे म्हटले होते. पण तो पुढे म्हणालेला की, ज्यांनी पुरस्कार परत केलेत त्यांचा मी आदर करतो. मात्र मला मिळालेले पुरस्कार परत करण्याची माझी इच्छा नाही.
चित्रपटकर्ता दिबाकर बॅनर्जी, आनंद पटवर्धन आणि अजून आठ जणांनी आपले राष्ट्रीय पुरस्कार परत केले आहेत.