अभिनेत्री जया बच्चन यांनी ‘मुंबई लिट फेस्ट’च्या व्यासपीठावरून बोलताना फराह खान दिग्दर्शित ‘हॅप्पी न्यू इअर’ चित्रपटावर टीका केली. त्यांचे हे विधान कर्णोपकर्णी होऊन काही तास उलटायच्या आतच खुद्द अमिताभ बच्चन यांनी पत्नीच्या वतीने शाहरूख खानची माफी मागितली. तर आता लिट फेस्टच्या आयोजकांनीही जया बच्चन यांनी हे विधान त्या कार्यक्रमात त्यांना विचारल्या गेलेल्या प्रश्नाच्या संदर्भात केले होते. मात्र, प्रसिध्दी माध्यमांनी संदर्भ सोडून त्या विधानाचा विपर्यास केला असल्याचे म्हटले आहे. जया बच्चन यांनी आपले विधान मागे घेतलेले नाही मात्र, त्यांच्या वतीने इतरांचीच सारवासारव चालू असल्याचे दिसते आहे. 

‘टाटा लिटरेचर लाइव्ह! द मुंबई फेस्ट’ या कार्यक्रमात जया बच्चन यांना आमंत्रित करण्यात आले होते. तिथे त्यांची मुलाखत घेण्यात आली होती. मुलाखतीत जया बच्चन यांनी आपल्याकडे दोन प्रकारचे चित्रपट प्रवाह असल्याचा उल्लेख केला. आणि त्याबद्दल तपशीलवार बोलत असताना त्यांनी ‘हॅप्पी न्यू इअर’ चित्रपटाबद्दल काही मते मांडली होती, असे महोत्सवाचे आयोजक अनिल धारकर यांनी म्हटले आहे. आपल्याकडे साहित्यावर आधारित चित्रपट आजकाल फार कमी पहायला मिळतात आणि दुसरे मनोरंजनात्मक चित्रपट, असे जया बच्चन यांनी म्हटले. मनोरंजनात्मक चित्रपटांचा दाखला देताना त्यांनी ‘अमर अकबर अँथनी’विषयी सांगितले. त्या चित्रपटाला काही अर्थ नसताना केवळ मनोरंजन करणारा चित्रपट म्हणून तो आपल्याला आवडला होता. तसाच ‘हॅप्पी न्यू इअर’ हा चित्रपटही आपल्याला आवडला आहे, असे जया बच्चन यांनी कार्यक्रमात सांगितल्याचे धारकर यांनी म्हटले आहे. उलट, जया बच्चन यांनी अभिषेकचे आपण कधीही कौतुक केलेले नाही मात्र, या चित्रपटासाठी त्याचे कौतुक केल्याचेही धारकर यांनी स्पष्ट केले.
जया बच्चन यांची ही मुलाखत अनेकांनी ऐकली आहे. त्यांनी ‘हॅप्पी न्यू इअर’संदर्भात कुठलीही टीका केलेली नाही हे मुलाखत ऐकलेल्यांच्या लक्षात येईल, असे सांगून अशाप्रकारे विधानाचा विपर्यास करणाऱ्यांनी जया बच्चन यांच्याबरोबर महोत्सवाचीही बदनामी केली असल्याचे धारकर यांनी निवेदनात म्हटले आहे.
या सगळ्यात आपल्या विधानावरून झालेल्या गोंधळाबाबत जया बच्चन यांनी मात्र मौनच बाळगले आहे. त्यांनी शाहरुखची किंवा फरहाची माफी मागितल्याचे ऐकिवात नाही. मात्र, अमिताभ बच्चन यांनी या विधानावरून होणारा गोंधळ लक्षात घेत घाईघाईने शाहरूखची माफी मागितली. एवढेच नाही तर आपल्या पत्नीने ‘हॅप्पी न्यू इअर’ चित्रपटाच्या बाबतीत केलेले विधान हे शाहरूखला दुखावण्यासाठी किंवा चित्रपटाची बदनामी करण्यासाठी नव्हते, असा खुलासाही त्यांनी शाहरूख केला आहे.