प्रसिद्ध गायक सोनू निगम हा नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असतो. सध्या सोनू निगम हा सोशल मीडियावर ट्रोल होताना दिसत आहे. एका मुलाखतीदरम्यान केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे तो चांगलाच चर्चेत आला आहे. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या क्लिपमध्ये सोनू निगमने नवरात्रीत मटण बंदी कशाला? असे वक्तव्य केले आहे. त्याच्या या विधानामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याच्या या वक्तव्यावर अनेक लोक भडकले असून त्याला ट्रोल केले जात आहे.

सोनू निगमने काही दिवसांपूर्वी एक मुलाखत दिली. या मुलाखतीदरम्यानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत सोनू निगम म्हणतो की, “नवरात्रीदरम्यान मटणाची दुकाने बंद करणे चुकीचे आहे. जो व्यक्ती मटणाची विक्री करत आहे, ते त्याचे काम आहे. त्याच्यावर त्याचा उदरनिर्वाह सुरु आहे. त्याचे दुकान तुम्ही बंद करु शकत नाही. तुम्ही म्हणता तेव्हा मी जय श्री राम म्हणायला मी काही त्यांचा भक्त नाही.” मुलाखतीदरम्यानचा हा भाग सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावर अनेक नेटकरी संताप व्यक्त करत आहे.

ज्ञानवापी मशीद वादावर कंगना रणौतचे मोठे वक्तव्य, म्हणाली “काशीच्या प्रत्येक कणाकणात…”

सोनू निगमचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी त्याला विरोध करण्यास सुरुवात केली आहे. ‘नवरात्रीत मटण बंदी करु नका’, ‘मी जय श्री राम म्हणायला भक्त नाही’, या विविध वक्तव्यावरुन नेटकरी त्याला सुनावताना दिसत आहेत. यापूर्वीही अनेकदा सोनू निगमने वादग्रस्त विधाने केली आहेत.

यापूर्वीही २०१७ मध्ये सोनूने मशिदीवरील भोंग्याद्वारे अजानचा विरोध केला होता. त्यानंतर त्याने सारवासारव करत सोनूने पत्रकार परिषद घेत यावर स्पष्टीकरण दिले आहे. मी फक्त एका सामाजिक विषयावर माझं मत मांडलं आहे. कोणत्याही धर्माचा मी विरोध केलेला नाही. मी धर्मनिरपेक्ष आहे. हे अजान संदर्भात नाही तर भोंग्याच्या माध्यमातून निर्माण होणाऱ्या आवाजाच्या तीव्रतेसंदर्भात होतं, असे तो म्हणाला होता. मी मंदिर आणि गुरुद्वारासंदर्भातही हेच बोललो होतो. पण याच्याकडे कोणी लक्ष दिलं नाही, असेही त्यावेळी त्याने म्हटले होते.