Sreesanth on Wife Bhuvneshwari Kumari: माजी क्रिकेटपटू आणि अभिनेता एस. श्रीसंत याच्यावर २०१३ मध्ये स्पॉट फिक्सिंग आणि सट्टेबाजी प्रकरणात आरोप झाले होते. श्रीसंतने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत यावर वक्तव्य केले आहे. तसेच, त्या कठीण काळात तिला कोणी खंबीरपणे साथ दिली, हेदेखील त्याने सांगितले आहे.

जेव्हा हे आरोप त्याच्यावर झाले तेव्हा त्याचे लग्न झाले होते. आताची पत्नी आणि त्यावेळची गर्लफ्रेंड भुवनेश्वरी कुमारीने तसेच तिच्या कुटुंबाने त्या कठीण परिस्थितीत साथ दिली. तसेच भुवनेश्वरी आणि श्रीसंतने लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. त्यादरम्यानच त्याला स्पॉट फिक्सिंग प्रकरणात अटक झाल्याचे श्रीसंतने सांगितले.

“मला दहशतवादी…”

श्रीसंतने एका मुलाखतीत त्याला जेव्हा अटक झाली होती, तेव्हाची आठवण सांगितली. श्रीसंत व त्याची पत्नी भुवनेश्वरी यांनी नुकतीच ‘हु इज द बॉस (Who’s The Boss)या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. तो म्हणाला, “मी भुवनेश्वरीच्या वडिलांना सांगितले होते की, कदाचित मला देशासाठी खेळता येणार नाही. त्यावेळी मला दहशतवादी वगैरे म्हणून लेबल लावलं जात होतं; पण तरीही भुवनेश्वरीच्या कुटुंब ठामपणे माझ्या पाठीशी उभं राहिलं. म्हणूनच शेखावत कुटुंबीयांप्रति माझ्या मनात खूप आदर आहे.”

याच मुलाखतीत श्रीसंतची पत्नी भुवनेश्वरी म्हणाली, “आम्ही लग्न करणार आहोत, याबद्दल वडिलांना सांगितलं नव्हतं. त्याआधीच श्रीसंतला अटक झाली. त्यावेळी मी हैदराबादला गेले होते. माझ्या मित्रांनी सकाळी ७, वाजता टीव्ही लावायला सांगितले. त्यावेळी श्रीसंतला अटक झाल्याचे मला समजले. ते पाहिल्यानंतर मी माझ्या वडिलांना काय सांगणार असा प्रश्न मला पडला होता. त्यावेळी मला जमीन दुभंगावी आणि तिनं मला पोटात घ्यावं, मी नाहीसं व्हावं, असंच मला वाटत होतं.”

पुढे ती म्हणाली, “मी हैदराबादला गेले हे माझ्या वडिलांना आवडलं नव्हतं. त्यांनी मला घरी परत बोलावलं. मी त्यांना म्हणाले की, तुम्ही माझं म्हणणं ऐकाल आणि टीव्हीवर जे काही दाखवलं जात आहे, त्यावरून हे लग्न मोडणार नाही हे वचन जोपर्यंत तुम्ही मला देणार नाही, तोपर्यंत मी घरी येणार नाही. कारण- जरी देवानं मला येऊन सांगितलं की, श्रीसंतने हे सर्व केलं आहे तरी मी त्यावर विश्वास ठेवणार नाही.”

श्रीसंत पुढे म्हणाला, “त्या वेळी नेमकं काय घडत होतं, हेच मला समजत नव्हतं. मला अटक करण्यात आली होती. तेव्हा मला जाणवलं की, खरा बॉस एकच आहे आणि तो म्हणजे देव आहे. मी आयुष्यातील सगळ्यात कठीण अवस्थेत होतो. माझ्या मनात आत्महत्येचे विचार येत होते. आता सगळं संपलं आहे, असं मी स्वत:ला सांगितलं होतं. कारण- मला दहशतवादी म्हटलं जात होतेतं. आता तुझं आयुष्य संपलं आहे, असं आजूबाजूचे लोक सतत सांगत होते. मी माझ्या भावाला सांगितलं होतं की, पुढच्या तीन ते चार दिवसांत कदाचित माझा खून होईल किंवा मी स्वतःच आत्महत्या करेन किंवा काहीही होऊ शकतं.”

श्रीसंतने असेही सांगितले की, तो त्याच्या होणाऱ्या सासऱ्यांना पहिल्यांदा कोर्टात भेटला होता. तो म्हणाला, “माझ्या भावानं मला फक्त एकच गोष्ट सांगितली होती की, भुवनेश्वरी गेली सात वर्षं तुझी वाट पाहत आहे. ती मला म्हणाली होती की, ती तुझ्याबरोबर आहे. तिनं त्या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी आत्मविश्वास दिला.”

तो पुढे म्हणाला, “मी माझ्या सासऱ्यांना पहिल्यांदा कोर्टातच भेटलो. मी रडवेला झालो होतो; पण त्यांनी मला धीर दिला. त्यांनी काळजी करू नकोस, स्ट्राँग राहा, असे सांगितले. मी २७ दिवस तिहारच्या तुरुंगात होतो. मी जोपर्यंत तुरुंगात होतो, तोपर्यंत भुवनेश्वरी जमिनीवर झोपत होती.”

दरम्यान, श्रीसंत आणि भुवनेश्वरी यांनी २०१३ मध्ये लग्न केले. श्रीसंतने अभिनय क्षेत्रातही काम केले आहे. तो ‘बिग बॉस’च्या १२ व्या पर्वातही स्पर्धक म्हणून सहभागी झाला होता.