प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचे बुधवारी सकाळी निधन झाले.हृदयविकाराचा झटका आल्यानंतर १० ऑगस्टपासून त्यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरु होते. गेले अनेक दिवस ते व्हेंटिलेटरवर होते. मात्र त्यांची मृत्यूशी सुरु असलेली झुंज अखेर थांबली. राजू श्रीवास्तव गेली अनेक वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन करत होते. करियरची सुरवात त्यांनी छोट्या मोठ्या कार्यक्रमातून केली, मूळचे उत्तर प्रदेशचे असलेले राजू श्रीवास्तव बॉलिवूड काम करण्यासाठी मुंबईला आले होते.

लहानपणासून त्यांना नकला करण्याची हौस होती. अमिताभ बच्चन यांचे ते मोठे चाहते होते. एका मुलाखतीत त्यांनी सांगितलं होत ‘मी माझ्या घरावरदेखील बच्चनजींच्या चित्रपटाचं पोस्टर लावले होते. मी त्यांच्यासारखी केशरचना केली होती. लोक मला बच्चनजी म्हणून ओळखू लागले होते. सुरवातीला मी लोकांच्या घरी काही समारंभ असेल तर त्यांच्याकडे जाऊन मी सगळ्यांचे मनोरंजन करीत असे. सुरवातीला मी बच्चजींची नक्कल करत असे. सुरवातीला माझे खूप कौतुक झाले मात्र नंतर मला ओळख मिळणं बंद झालं म्हणून मी बच्चनजींची नक्कल करणे थांबवले, मी नंतर लालू प्रसाद यादव, धर्मेंद्र, शशी कपूर, दिलीप कुमार यांची नक्कल करू लागलो’.

भोजपुरी अभिनेत्रीला ‘चंद्रा’ची भूरळ, लावणी करत धरला ठेका, व्हिडिओ व्हायरल

नकला आणि विनोदाचं टायमिंग यामध्ये राजू यांचा हात धरणारं तेव्हातरी कुणीच नव्हतं. आपल्या संपूर्ण करियरचं श्रेय राजू यांनी अमिताभ बच्चन यांना दिलं आहे. राजू म्हणाले, “माझ्या पोटापाण्याचा प्रश्न हा बच्चनजी यांच्यामुळेच सुटला. त्यामुळेच माझ्या आयुष्यात त्यांचं अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि ते तसंच राहील.”

राजू श्रीवास्तव यांचा प्रवास खडतर होता. सुरवातीला त्यांना काम मिळत नव्हते तेव्हा पोटापाण्यासाठी रिक्षादेखील चालवली होती. ‘मैने प्यार किया’, ‘बाजीगर’, यासारख्या चित्रपटात त्यांनी छोट्या भूमिका साकारायला होत्या. राजू श्रीवास्तव अनेक लोकप्रिय टीव्ही शोचा भाग राहिले आहेत. ‘बिग बॉस’, ‘शक्तिमान’, ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’, ‘कॉमेडी सर्कस’ आणि ‘द कपिल शर्मा शो’ यासारख्या कार्यक्रमांमधून त्यांनी आपले मनोरंजन केले आहे.