प्रत्येकालाच आयुष्यात एकतरी ब्रेक हवाच असतो. आणि तो मिळणं हा खरंतर प्रत्येकाचा हक्कही असतो. ही कहाणी आहे या चौघींची..ज्यांनी आपल्याला हवा असलेला ब्रेक हक्कानं मागून घेतला. चला तर मग जाणून घेऊया काय आहे हे प्रकरण?
चार गृहिणी, तेच ते चौकटीत कोंडलेलं आयुष्य आणि त्यातून रिलॅक्स होण्यासाठी घेतलेला एक ब्रेक साधारण अशीच कथा असलेली एक कहाणी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘जहा चार यार’ हा नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातून या चौघींची कहाणी सांगितली जाणार आहे. कोण आहेत या चौघी?

या आहेत अभिनेत्री स्वरा भास्कर, शिखा टालसानिया, मेहेर विज आणि पूजा चोप्रा. यांची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटात घराला, नवऱ्याला आणि त्याच त्याच आयुष्याला कंटाळलेल्या चौघी मैत्रिणी गोव्याला एका सुट्टीसाठी आणि मजा करण्यासाठी जातात. पण तिथे त्यांच्यासोबत काय घडतं हे सांगणारी थरारक कथा सांगितली आहे.

या चित्रपटाचे निर्माते विनोद बच्चन म्हणतात की, आता चित्रपटगृहांची दारं उघडली आहेत. त्याचप्रमाणे प्रेक्षकांच्या मनाची दारंही उघडली असतील. त्यामुळे आम्ही या धमाकेदार चित्रपटाने त्यांचं स्वागत करत आहोत. ‘जहा चार यार’ ही अनेक रोमांचकारी वळणांनी भरलेली मैत्रीची कथा आहे. ज्यामुळे मोठ्या पडद्यावरच्या मनोरंजनाला नक्कीच पूर्वरुप मिळेल.
लेखक कमल पांडे यांचा दिग्दर्शक म्हणून पहिलाच चित्रपट आहे. त्यांनी शादी मे जरूर आना, साहेब बिवी और गँगस्टर, शागिर्द, शक्तीः द पावर(संवादलेखन) अशा चित्रपटांचं लेखन केलं आहे.
या चित्रपटाचं चित्रीकरण उत्तर प्रदेशाच्या स्थानिक भागात तसंच गोव्याच्या समुद्रकिनारी होणार आहे. येत्या 5 मार्चपासून या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होत आहे.