अभिनेत्री पायल घोषने केलेल्या गंभीर आरोपांमुळे प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यप सध्या चर्चेत आहे. अनुराग कश्यपने माझ्यासोबत गैरवर्तन केले असून मला अत्यंत वाईट पद्धतीची वागणूक दिली आहे असे ट्विट पायलने केले होते. त्यानंतर अनेक कलाकारांनी यावर प्रतिक्रिया दिल्या. अभिनेत्री तापसी पन्नूने सोशल मीडिया पोस्टद्वारे अनुरागला पाठिंबा दिला. आता नुकताच या संदर्भात तापसीने मुलाखत दिली आहे.

तापसीने नुकतीच ‘मुंबई मिरर’ला मुलाखत दिली. त्यावेळी तिला अनुराग कश्यपवर करण्यात आलेल्या आरोपांसंबंधी काही प्रश्न विचारण्यात आले. ‘अनुराग महिलांचा आदर करतो. जर एखादी व्यक्ती त्याच्यासोबत चुकीची वागली तरी देखील तो त्या व्यक्तीशी चांगले बोलतो. अनुरागच्या चित्रपटांचे सेट हे इतरांपेक्षा फार वेगळे असतात. त्याच्या सेटवर क्रू मेंबर्समध्ये पुरुषांइतक्याच स्त्रिया असतात. ते देखील नेहमी अनुराग विषयी खूप चांगल्या गोष्टी बोलत असतात’ असे तापसी म्हणाली.

आणखी वाचा- अनुराग कश्यपविरोधात वर्सोवा पोलीस स्थानकात एफआयआर दाखल

‘जर अनुराग दोषी अढळला तर त्याच्यासोबत असणारे सर्व संबंध तोडणारी पहिली व्यक्ती मी असेल’ असे तापसी पुढे म्हणाली. यापूर्वी तापसीने सोशल मीडिया पोस्टद्वारे अनुरागला पाठिंबा दिला होता. ‘माझ्या मित्रा, मला माहित असलेल्यांपैकी तू सर्वांत मोठा स्त्रीवादी आहेस. सेटवर लवकरच भेटू. तू निर्माण करत असलेल्या विश्वात स्त्रिया किती सामर्थ्यशाली आणि महत्त्वपूर्ण आहेत हे त्यातून (चित्रपटातून) स्पष्ट होणार आहे’, असे तापसीने पोस्टमध्ये म्हटले होते.

आणखी वाचा- “माझं नाव वापरुन…”; अनुरागवर आरोप करणाऱ्या अभिनेत्रीला हुमा खुरेशीने सुनावलं

पायल घोषचा आरोप काय?
“अनुराग कश्यपने माझ्यासोबत गैरवर्तन केलं असून मला अत्यंत वाईट पद्धतीची वागणूक दिली आहे. कृपया या व्यक्तीविरोधात काही तरी कारवाई करा, ज्यामुळे या माणसाचं खरं रुप समोर येईल. मला माहित आहे यामुळे मला धोका असून माझ्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे कृपया माझी मदत करा”, असं ट्विट पायलने केलं.

आणखी वाचा- ‘अनुरागने मुलाचे शोषण…’, कंगनाने शेअर केला जुना व्हिडीओ

अनुरागने फेटाळले आरोप
“क्या बात है. मला गप्प करण्यासाठी बराच वेळ घेतलास. काही हरकत नाही. पण मला गप्प करता करता इतकं खोटं बोललीस की स्वत: सोबत अन्य महिलांनादेखील या वादात घेतलंस. थोडी तरी मर्यादा बाळगा मॅडम, बास्स इतकंच बोलू शकतो मी. जे काही आरोप केले आहेत ते सगळे अर्थहीन आहेत”, असं ट्विट अनुराग कश्यपने केलं आहे.