बॉलिवूडमध्ये #MeToo मोहिमेने जोर धरला आहे. पण ही मोहीम सुरू होण्यासाठी कारणीभूत ठरली अभिनेत्री तनुश्री दत्ता. तनुश्रीने अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर गैरवर्तणुकीचे आरोप केल्यानंतर कलाविश्वात ही मोहिम सुरू झाली. २००८ साली ‘हॉर्न ओके प्लीज’ या चित्रपटाच्या सेटवर नानांनी असभ्य वर्तन केल्याचा आरोप तनुश्रीनं केला. तिच्या या आरोपांनंतर बॉलिवूडमध्ये एकच खळबळ माजली. अनेक कलाकारांनी तिला पाठिंबाही दर्शविला तर काहींनी तिच्यावर टीका केली. अशातच बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी मात्र या प्रकरणावर सोयीस्कररित्या बोलणं टाळलं. बिग बींच्या मौनाबाबत आता तनुश्रीने प्रतिक्रिया दिली आहे.

या प्रकरणावर भाष्य करायला मी काही तनुश्री दत्ता किंवा नाना पाटेकर नाही, असं म्हणत बिग बींनी #MeToo मोहिमेवर बोलणं टाळलं होतं. यावर एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत तनुश्री म्हणाली, ‘त्यांना हे सर्व आरोप वादग्रस्त वाटतात. ही एक नव्या बदलाची सुरुवात आहे असं त्यांना वाटत नाही. एखादी गोष्ट वादग्रस्त वाटल्यास, ती संपण्याची तुम्ही प्रतीक्षा करता. दहा वर्षांपूर्वी मी या विषयावर खूप काही बोलले. सलग तीन दिवस दिवस मी वाहिन्यांना मुलाखती देत होते. तेव्हा माझ्याकडे गमावण्यासारखं बरंच काही होतं. तेव्हाच कुठे मला चांगलं काम मिळायला सुरुवात झाली होती. पण स्वत:ला वाचवण्यासाठी मला बोलावं लागलं. पण त्याचा काहीच परिणाम झाला नाही.’

वाचा : ‘तानाजी’ चित्रपटात काजोल साकारणार महत्त्वाची भूमिका 

‘मोठे कलाकार अशा विषयांवर मोकळेपणाने व्यक्त होत नाहीत. काहीजण पाठराखण करतात. अनेकांनी सोशल मीडियावरून मला पाठिंबा दर्शविला. ज्यांच्यावर आरोप आहेत अशा लोकांसोबत काम न करण्याचा निर्णय काहींनी घेतला. मी सोशल मीडियावर नसल्याने त्यावर येणाऱ्या फारशा प्रतिक्रिया मला माहित नाहीत. पण माझ्या पाठिशी बरेच लोक आहेत, हे मला माहित आहे,’ असंही ती पुढे म्हणाली.

दहा वर्षांपूर्वी जर #MeToo सारखी मोहिम असती तर मी माझ्या कामापासून दूर गेले नसते अशीही खंत तनुश्रीने यावेळी व्यक्त केली. ‘आज लोकं किमान तुमचं ऐकून तरी घेत आहेत. देर आए दुरुस्त आए..’ असं तनुश्री म्हणाली.