नवरात्रीच्या नऊ दिवसांत नऊ देवींच्या रुपात अभिनेत्री तेजस्विनी पंडितने मोलाचा सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करत आहे. तिसऱ्या दिवशी तिने 'जरीमरी आई'च्या रुपातील फोटो पोस्ट केला असून त्याद्वारे नदी व समुद्राच्या प्रदूषणाचा मुद्दा मांडला आहे. ''माझ्या तळाशी असलेलं सारं काही तुला पाहता येतं ते बळजबरीने ओरबाडून ही घेता येतं, पण तुझ्या मनात काय सुरु आहे हे मात्र मला कळत नाही. कधी काळी मोती शंख शिंपल्यांनी उजळून जायचा माझा आसमंत .पण आता माझे अलंकार झालेत प्लास्टिकच्या पिशव्या, अर्धवट विरघळलेलया मूर्त्या, दारूच्या बाटल्या आणि घुसमटून मेलेले माझ्याच उदरातले जलचर. पहिल्यांदा माझ्या लाटांवर स्वार झाला होतास तेव्हा वाटलं नव्हतं माझी अशी फसवणूक करशील म्हणून.असं म्हणतात पेरिले तैसे उगवते बोलण्यासारखे उत्तर येते आता तुझ्या या वागण्याचं कसं प्रत्युत्तर देऊ मी.माझ्या लाटांनी तुझं जीवन कसं समृद्ध करू मी?'', असा सवाल तिने केला आहे. तेजस्विनी आपल्या अनोख्या कलाकृतींच्या माध्यमातून समाजाला भेडसावणाऱ्या प्रश्नांवर व्यक्त होत आहे. ती गेली दोन वर्षं नवरात्रोस्तवात वेगवेगळ्या संकल्पनांच्या माध्यमातून नारीशक्तीचा आविष्कार घडवत असते. यंदा ती महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या देवींच्या रुपातून या समस्यांवर व्यक्त होत आहे.