‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘सिंधुताई माझी माई’ या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत असलेले अभिनेते किरण माने नेहमी चर्चेत असतात. त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्ट या कायम चर्चेचा विषय असतात. कधी सद्यस्थितीवर तर कधी एखाद्या व्यक्तीविषयी किरण माने सोशल मीडियाद्वारे व्यक्त होत असतात. आज देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या वाढदिवसानिमित्ताने किरण मानेंनी एक पोस्ट शेअर केली आहे; जी चांगलीच चर्चेत आली आहे.
हेही वाचा – Video: करण कुंद्राने नव्या घरात केला गृहप्रवेश; पाहा मुंबईच्या समुद्र किनाऱ्यालगत असलेल्या घराची पहिली झलक
किरण माने यांची पोस्ट वाचा..
“खरंच देशाची आर्थिक स्थिती इतकी वाईट आहे का?” नव्यानं निवडून गेलेले त्यावेळचे पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव यांनी अर्थमंत्रालयातून आलेली आठ पानांची नोट वाचली आणि कॅबिनेट सेक्रेटरी नरेश चंद्रांना विचारलं…चंद्रांनी उत्तर दिलं “नाही… याहूनही खूप वाईट आहे” नरसिंहरावांचं टेन्शन वाढलं… लै बेक्कार काळ होता दोस्तांनो..भारतीय अर्थव्यवस्थेनं पार जीवच सोडला होता…शेवटच्या घटका! त्यात तिकडं आखाती युद्धाला सुरुवात झाल्यामुळं तेलाच्या दरांचा भडका उडला होता. पण नरसिंहराव लै धोरनी आन् हुशार माणूस. त्यांनी वळखलं की आर्थिक पेच सोडवण्यासाठी अर्थमंत्री पदावर कुनीबी ऐरागैरा, पक्षाच्या मर्जीतला कुनी थातूरमातूर खासदार बसवून चालणार नाय. नायतर पुढच्या अनेक पिढ्यांना त्याचे दुष्परिणाम भोगायला लागतील.
त्यांनी तातडीनं ‘अर्थव्यवस्था’ या विषयातील अशा अभ्यासू-तज्ज्ञ-बुद्धिमान व्यक्तीचा शोध घ्यायला सुरुवात केली, जो राजकारणाबाहेरचा असेल.. त्यावेळी त्यांना समजलं की, भारतात एक असा अर्थतज्ज्ञ प्राध्यापक आहे. ज्याला आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता आहे. रावांनी खोलात जाऊन त्याची माहिती काढली.. त्यानंतर त्यांना आशा वाटली, की या भयाण परीस्थितीत देशाला तारू शकेल असा एकच अत्यंत अभ्यासू-प्रतिभावान-खतरनाक माणूस आहे, वन ॲण्ड ओन्ली, द ग्रेट डॉ. मनमोहन सिंग.
मनमोहन सिंग यांनी पदावर आल्यापासूनच कामाचा धडाकाच लावला… पहिल्या झटक्यात मनमोहन सिंगांनी निधड्या छातीनं पत्रकार परिषद घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेचं भयाण भेसूर चित्र, न लपवता उघडपणे सर्वांसमोर मांडलं. निवडणुकीच्या काळात काँग्रेस
झालं! काँग्रेस पक्षात भूकंपच झाला. सगळे म्हणायला लागले “आवो पी.एम, काय बोलतायत हे? इतकं खरं बोलायचं असतं व्हय जनतेशी??” …पण पी.व्ही. नरसिंहराव हलक्या कानाचे आणि कच्च्या गुरुचे चेले नव्हते…त्यांनी लै दूरचा आणि देशाच्या अर्थव्यवस्थेच्या भल्याचा विचार करून या माणसाची निवड केली होती.
१९९१च्या पहिल्याच अर्थसंकल्पीय भाषणाची सुरुवात मनमोहन सिंग यांनी व्हिक्टर ह्यूगो याच्या वाक्यानं केली, “ज्या विचारांची वेळ आली आहे, त्याला जगातली कुठलीही ताकद रोखू शकत नाही. ” त्यानंतर देशात जी हवा आली भावांनो, ती याआधी कधीच आली नव्हती. मरणाच्या दारात असलेली आपली अर्थव्यवस्था फक्त रुळावरच आली नाही, तर तिनं बुलेट ट्रेनच्या दहापट वेग पकडला. आज जगभर इकॉनॉमीचे शिक्षण देणार्या युनिव्हर्सिटीजमध्ये मनमोहन सिंगांना ‘भारताच्या आर्थिक क्रांतीचा जनक’ म्हणून ओळखलं जातं मित्रांनो… भारताला जगाची दारं उघडून देणार्या जागतिकीकरणाची सुरुवात करताना १९९१ ते १९९६ या काळात त्यांनी घेतलेले अभूतपूर्व निर्णय जगभर अभ्यासले जातात.. मनरेगा सारख्या अफलातून निर्णयांनी प्रत्येक हाताला काम मिळालं..गोरगरीबांच्या घराघरात चूल पेटली…
असो. तर आपल्याकडं अशी लै लै लै ग्रेट माणसं हायत भावांनो. आपला देश महान हाय त्यो अशा दूरदर्शी आणि बुद्धीमान लोकांमुळंच! वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा सरदार मनमोहन सिंग. कडकडीत सलाम
– किरण माने.
हेही वाचा – Video: “जगातलं अंतिम सत्य”; प्रसाद ओक आणि गौरव मोरेचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल, नेटकरी म्हणाले…
दरम्यान, किरण माने यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतून खरंतर ते घराघरात पोहोचले. त्यानंतर झालेल्या वादामुळे ते आणखी प्रकाशझोतात आले. काही काळ ते कोणत्याही मालिकेमध्ये झळकले नाही. पण नंतर बिग बॉस मराठी चौथ्या पर्वात त्यांनी प्रवेश केला आणि पुन्हा एकदा आपल्या खेळातून आणि स्पष्टवक्ते स्वभावाने प्रक्षेकांनी मनं जिंकून घेतली.
मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actor kiran mane share special post for former prime minister manmohan singh on his birthday pps