Kushal Tandon Mother Cancelled Turkey Trip: दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे २६ पर्यटकांची हत्या केली. त्यानंतर भारतीय सुरक्षा दलांनी ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर हल्ला केला. यानंतर भारत व पाकिस्तानदरम्यानचा तणाव खूप वाढला आहे.

पाकिस्तान भारताच्या सीमेलगतच्या (India Pakistan Tension) राज्यांमधील काही ठिकाणांवर सातत्याने ड्रोन हल्ले करत आहे. भारतीय सैन्य त्यांना चोख प्रत्युत्तर देत आहे. या सर्व घडामोडींवर कलाकार व्यक्त होत आहेत. अनेक कलाकारांनी भारतीय लष्कराचे आभार मानले आहेत. याच दरम्यान अभिनेता कुशाल टंडनने एक अपडेट शेअर केली आहे. कुशालच्या आईने ऑपरेशन सिंदूरनंतर तुर्कस्तानची ट्रिप रद्द केली आहे. त्यामागचं कारणही कुशालने सांगितलं आहे.

कुशाल टंडनच्या आईने रद्द केली तुर्कस्तानची ट्रिप

कुशाल टंडनने त्याच्या सोशल मीडियावर अकाउंटवर पोस्ट करून सांगितलं की त्याच्या आईने आणि तिच्या मैत्रिणींनी त्यांची पुढील महिन्याची तुर्कस्तानची ट्रिप रद्द केली आहे. कुशालने याचे कारणही सांगितले आहे. भारत पाकिस्तान तणावादरम्यान तुर्कस्तानने पाकिस्तानला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे कुशालच्या आईने ट्रिप रद्द केली. त्यांना हॉटेल आणि एअरलाइन्सकडून कोणताही परतावा मिळालेला नाही.

कुशाल म्हणाला, “माझी आई आणि तिच्या मैत्रिणी पुढच्या महिन्यात तुर्कस्तानला जाणार होते, पण आता त्यांनी त्यांची ट्रिप कॅन्सल केली आहे, त्यांना हॉटेल आणि एअरलाइन्सकडून कोणताही परतावा मिळालेला नाही.” कुशालने ही पोस्ट केल्यानंतर नेटकरी त्याच्या आईच्या निर्णयाचं कौतुक करत आहेत.

Kushal Tandon Mother Cancelled Turkey Trip
कुशाल टंडनने केलेली पोस्ट (सौजन्य – इन्स्टाग्राम)

तुर्कस्तान व अझरबैजानचा पाकिस्तानला पाठिंबा

तुर्कस्तानने पाकिस्तानला पाठिंबा दिल्यानंतर कुशाल टंडनने ही पोस्ट केली आहे. या दोन्ही देशांनी पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादी तळांवर भारताने केलेल्या हवाई हल्ल्यांचा निषेध केला होता. तुर्कस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने भारताने केलेले ऑपरेशन सिंदूर योग्य नसल्याचे म्हटले होते. तर अझरबैजानच्या परराष्ट्र मंत्रालयाने भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांबद्दल शोक व्यक्त केला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कुशाल टंडनच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास तो शेवटचा ‘बरसातें-मौसम प्यार का’ मालिकेत झळकला होता. या मालिकेत त्याची गर्लफ्रेंड शिवांगी जोशीही मुख्य भूमिकेत होती. ही मालिका जानेवारी महिन्यात संपली.