Pushkar Jog Angry On Rakhi Sawant :’बिग बॉस मराठी’चा ६ वा सीझन सध्या रंगात आला आहे. घरात होणाऱ्या प्रत्येक घडामोडीवर शोचे एक्स स्पर्धक तसेच काही इतर कलाकार त्यांची मते व्यक्त करत असतात. असाच ‘बिग बॉस’च्या घरातील प्रत्येक घडामोडीवर आपले स्पष्ट मत व्यक्त करणारा एक्स स्पर्धक व अभिनेता म्हणजे पुष्कर जोग.
पुष्कर जोग ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील स्पर्धकांच्या खेळावर अन् त्यांच्या वागणुकीवर त्याचे स्पष्ट मत व्यक्त करताना दिसतो. अशातच त्याने शोमध्ये नुकत्याच झालेल्या एका वादावर आपली स्पष्ट प्रतिक्रिया व्यक्त केली. त्याबद्दलची पोस्ट त्याने सोशल मीडियावर शेअर केली आहे.
‘बिग बॉस’च्या घरात मंगळवारच्या भागात राखी सावंत आणि सागर कारंडे यांच्यात वाद झाला. या वादाबद्दलचीच पोस्ट पुष्करने शेअर केली आहे. या पोस्टमधून त्याने राखीच्या वागणुकीवर चांगलेच ताशेरे ओढले आहेत. पुष्कर नेमके काय म्हणालाय? चला जाणून घेऊ…
“राखीला एलिमिनेट करा”, पुष्कर जोगची संतप्त प्रतिक्रिया
इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये पुष्कर म्हणतो, “घरात ओक्साबोक्शी ओरडणाऱ्या, बेशिस्त, उद्धट राखीने आज अन्नाची नासाडी केली. कॅप्टन संकेत बघत उभा होता. चार-पाच स्पर्धक तिची बाजू घेत होते. हे सगळं बघून त्यांना स्वतःची लाज वाटली पाहिजे. घरात वात्रटपणे वागणाऱ्या राखी सावंतला मानसिक उपचारांची गरज आहे. बाहेर अश्लील पद्धतीनं पॅप्समध्ये स्पॉट व्हायचं आणि ‘बिग बॉस’च्या घरात निगेटिव्ह राडा घालायचा. या महान शोची शान राखा. राखीला एलिमिनेट करा.”

दरम्यान, पुष्करने राखीवर रागावण्याचं नेमकं कारण काय? तर, नुकत्याच झालेल्या भागात राखी जेवण बनवत असताना तिला चहा बनवण्यासाठी सांगितलं जातं. जे तिला मान्य नसतं. त्यामुळे सागर कारंडेसह घरातले काही स्पर्धक आणि राखी यांच्यामध्ये वाद होतो.
राखी सावंत आणि सागर कारंडेमध्ये ‘या’मुळे वाद
राखी मुद्दाम चहाच्या टोपात भाजी टाकते. त्यावरून रेवा, दीपाली व राखी यांच्यात वाद व्हायला सुरुवात होते. नंतर सागर येतो आणि दीपालीला बाजूला घेऊन जातो. त्याचदरम्यान राखी जोरजोरात ओरडते. ती कॅप्टन संकेतचंसुद्धा ऐकत नाही. राखीला ओरडताना पाहून सागर तिला “ओरडू नकोस”, असं सांगतो. तो तिला समजावत असतो; पण राखी त्याचं काही ऐकूनच घेत नाही. त्यावर दोघे एकमेकांशी जोरात वाद घालू लागतात. दोघांच्या वादात राखी त्याला हात लावते. त्यावर सागरसुद्धा हात लावू नकोस, असं म्हणत चिडतो. दोघे एकमेकांच्या अंगावर धावून जातात, तेव्हा राकेश तिला बाजूला घेऊन जातो. नंतर शेवटी राखी रागात येऊन जेवण टाकून देते.
