Lakshmi Niwas : ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत सध्या भावना जान्हवीच्या घरी राहायला गेल्याचा सीक्वेन्स चालू आहे. भावनाच्या गळ्यात मंगळसूत्र असल्याचं सत्य सर्वांसमोर येतं. त्यामुळे तिला काही दिवस शांतता मिळावी यासाठी श्रीनिवास भावनाला जान्हवीकडे राहायला जाण्यास सांगतो. जान्हवी जयंतची रितसर परवानगी घेऊन भावना आणि आनंदीला आपल्या घरी येण्यास सांगते.

बहिणीला घरी आणल्यावर जान्हवी आपल्या बहिणीला मानसिक व भावनिक आधार देण्यासाठी सतत तिची विचारपूस करते, तिची काळजी घेते. आपली जानू आपल्याला सोडून बहिणीच्या मागेपुढे करतेय ही गोष्ट जयंतला प्रचंड खटकते. तो पहिल्यापासून विकृत आणि बायकोच्या बाबतीत प्रचंड पझेसिव्ह असतो. आता तो बायकोला या सगळ्याबद्दल जाब विचारणार आहे.

जान्हवीने सतत भावनाची काळजी घेणं, तिच्याबरोबर राहणं या गोष्टी आता जयंत आवडत नाहीये. म्हणून तो जान्हवीवर प्रचंड भडकतो. बहिणीमुळे तू माझ्यावर दुर्लक्ष करतेस, मला विसरलीस असे आरोप जयंत तिच्यावर करतो. जयंतचा राग, त्याचं ते विकृत रुप पाहून जान्हवी प्रचंड घाबरते आणि त्याला समजवण्याचा प्रयत्न करते. “ताईला आधार देण्यासाठी मी हे सगळं करतेय” असं ती जयंतला सांगते. पण, जयंत बायकोचं काहीच ऐकून घेण्यास तयार नसतो.

जयंत जान्हवीला म्हणतो, “तुझं माझ्यावर खरंच प्रेम असेल आणि विश्वास असेल तर किचनच्या प्लॅटफॉर्मवर उभी राहा आणि तुझे दोन्ही हात वर कर…आता स्वत:ला माझ्यावर झोकून दे” जयंतची ही शिक्षा ऐकून जान्हवी खूप बिथरते. तिला उडी मारायची भीती वाटत असते पण, जयंतसमोर तिचं काहीच चालणार नसतं.

अशातच मागून जान्हवी मावशी असा आवाज येतो. किचनजवळ आनंदी येऊन उभी असते. जान्हवीला पाहिल्यावर ती पटकन ओट्यावर उभी राहून तू नेमकं काय करत आहेस मावशी असा प्रश्न विचारते. आनंदीला पाहून जयंतही घाबरतो. आता आनंदी ही गोष्ट कोणाला जाऊन सांगेल? जयंत-जान्हवी आनंदीसमोर घडलेल्या प्रकरणाची सारवासारव कशी करतील? या गोष्टी मालिकेच्या आगामी भागात स्पष्ट होतील.

दरम्यान, ‘लक्ष्मी निवास’ मालिका झी मराठी वाहिनीवर दररोज रात्री ८ ते ९ या वेळेत तासभर प्रसारित केली जाते. यामुळेच या मालिकेला टेलिव्हिजनची महामालिका म्हणतात.