‘लक्ष्मी निवास’ मालिकेत सध्या सिद्धूच्या लग्नाची लगबग सुरु आहे. या कार्यात सुरुवातीपासूनच इतकी विघ्न येत आहेत की, लग्नापर्यंत काय घडेल याची कल्पना आता कुणालाच नाहीये. सिद्धूचं खरं प्रेम भावनावर असतं पण, प्रत्यक्षात त्याच्या आयुष्यात काहीतरी भलतंच घडतं. त्याचा साखरपुडा पूर्वीशी होतो. यामुळे सिद्धू प्रचंड नाराज होतो. मात्र, लवकरच ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत एक मोठा खुलासा होणार आहे.

सिद्धू आणि पूर्वी एकमेकांना सांगतात की, त्यांना हे लग्न करायचं नाहीये. यामुळे सिद्धू प्रचंड आनंदी होतो आणि तो भावनाला सगळं सत्य सांगायचं ठरवतो. भावनासमोर प्रेमाची कबुली देण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून सिद्धू वेगवेगळे प्लॅन्स बनवत असल्याचं पाहायला मिळत आहे. आता भावनासमोर प्रेम व्यक्त करण्यात सिद्धूला केव्हा यश मिळेल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. दुसरीकडे, भावना वेगळ्याच चिंतेत असते. आनंदी सुपर्णाच्या घरी राहून आल्यापासून ती कोणाशीच नीट बोलत नसते.

आनंदी सुपर्णाच्या घरी शनिवार-रविवार राहण्यासाठी जाते. पण, घरी परतल्यावर ती गप्प आणि अस्वस्थ असते. जेव्हा भावना तिला प्रश्न विचारते, तेव्हा ती टाळाटाळ करते. हे पाहून भावनाला आनंदीची काळजी वाटू लागते. ती तात्काळ सिद्धूला फोन करून घरी बोलवते. सिद्धू हळुहळू करून आनंदीला बोलतं करत असतो. आता आनंदी सिद्धूसमोर तिला सुपर्णाच्या घरी नेमका काय त्रास झाला हे सांगेल का? हे प्रेक्षकांना आगामी भागात पाहायला मिळेल.

याशिवाय लग्नाचे विधी सुरू असताना सिद्धूची आई त्याला “हे कुंकू देवीसमोर ठेव आणि पूर्वीच्या कपाळाला लाव” असं सांगते. पण, इतक्यात त्याचा तोल जातो आणि ताट हातातून निसटून सगळं कुंकू भावनाच्या कपाळावर पडतं. यामुळे सगळ्यांनाच धक्का बसतो. आता सिद्धूच्या हातून नकळत घडलेल्या या घटनेचे पुढे जाऊन काय परिणाम होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, आता सिद्धू-पूर्वीचं लग्न मोडल्यावर याचा सिद्धू आणि भावनाच्या नात्यावर काय परिणाम होणार? त्यांचं नातं बहरेल का? श्रीनिवासचं सत्य लक्ष्मीसमोर आल्यावर काय होईल? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना ‘लक्ष्मी निवास’ या मालिकेत रात्री ८ ते ९ या वेळेत पाहायला मिळणार आहेत.