Akshaya Naik regrets working in Savadhan India: पडद्यावर दिसणाऱ्या कलाकारांबाबत प्रेक्षकांना नेहमीच उत्सुकता असते. कलाकारदेखील त्यांच्या आयुष्यातील अनेक गोष्टी मुलाखती, सोशल मीडिया या माध्यमातून सांगत असतात. अनेक कलाकारांना कामाच्या ठिकाणी वेगवेगळे अनुभव आलेले असतात. आता अक्षया नाईकने एका मुलाखतीत यावर वक्तव्य केले आहे.

“मला ते आवडत नव्हतं.”

अक्षया नाईकने नुकतीच ‘मुक्काम पोस्ट मनोरंजन’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिला विचारण्यात आले की जवळजवळ २० वर्षे तू इंडस्ट्रीमध्ये काम करत आहेस. असं कोणतं काम होतं का की तुला वाटलं की हे करायला नको होतं? यावर उत्तर देताना अक्षया म्हणाली, “एक छोटंसं काम होतं. मी आजपर्यंत ‘सावधान इंडिया’चे दोन एपिसोड केलेत. पहिल्या एपिसोडची कथा खूप छान होती. खूप छान शूटिंग केलं. त्याचा अनुभव खूप चांगला होता.

अक्षया पुढे म्हणाली, “एक वर्षानंतर मला पुन्हा ‘सावधान इंडिया’साठी फोन आला. मी त्यांना होकार दिला. मी फार विचार केला नाही. चांगलंच असणार, असा विचार करून मी गेले. त्या एपिसोडमध्ये खून होणार आहे. तिथे गेल्यानंतर ते माझ्या तोंडावर बोलले की, ही मुलगी तर सुंदर आहे.

त्यांनी मला काळं केलं. गव्हाळ किंवा सावळी नाही तर डार्क ब्राऊन ते ब्लॅक ज्या शेड्स असतात, तसा त्यांनी माझा मेकअप केला. तरी त्यांचं म्हणणं असं होतं की, ही ठीक दिसत आहे. मग त्यांनी माझ्या चेहऱ्यावर जखमा असणारा मेकअप करायला सुरुवात केली. मला ते आवडत नव्हतं.”

“मला असं वाटत होतं की तुम्हाला कोणी हक्क दिला हे ठरवण्याचा की गोरी नसणारी किंवा जाड माणसं ही सुंदर दिसत नाहीत. म्हणजे ते विचार करत होते की, कोणीतरी जाड मुलगी येणार, म्हणजे ती चांगली दिसणार नाही. पण, त्यावेळी मी खूपच लहान होते. २१- २२ वर्षांची होते. तो सेट सोडून जावं, अशी माझी खूप इच्छा झाली होती. मला काम करायचं नव्हतं. पण, माझ्या स्वभावातच नाही की, आलोय आणि पुन्हा तो सेट सोडून जावं.

मी शूटिंग पूर्ण केलं. मला माहीतही नाही की तो एपिसोड कुठे आहे. मी तो एपिसोड प्रदर्शित झाल्यानंतर पाहिलासुद्धा नाही. ते शूटिंग करताना मला छान वाटलं नव्हतं. ते एक काम आहे, ज्याचा मला पश्चात्ताप झाला; पण ठीक आहे.”

अशा काही कामाच्या ऑफर्स येतात का, ज्या ऐकल्यानंतर वाटतं की, मला हे करायचं नाही. त्यावर अक्षया म्हणाली की, असं एकदा झालं होतं. मी तेव्हा २२-२३ वर्षांची होते. त्यांनी मला फोन केला आणि म्हणाले की, हिंदी मालिकेसाठी आहे. लीड आहे. मला असं वाटलं की, लीड आहे. ठीक आहे. मग मी होकार दिला.

तर ते मला म्हणाले की, तुम्हाला ८-९ वर्षांचा मुलगा असेल. त्यांनी मला संकल्पना सांगितली. ती अशी की, तो ८-९ वर्षांचा मुलगा त्याच्या वडिलांना म्हणतो की, आई जाड आहे, तर आपण नवीन आई आणूयात. मला ते ऐकल्यानंतर मला हे करायचं नाही, असं वाटलं होतं, असे म्हणत अक्षयाने तिचा अनुभव सांगितला.