मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय जोडी म्हणून अभिनेत्री सखी गोखले आणि सुव्रत जोशी यांना ओळखले जाते. दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेद्वारे ते घराघरात पोहोचले. या मालिकेत एकत्रच काम करताना त्यांची घट्ट मैत्री झाली. त्यानंतर ते दोघांच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. आता या लग्नादरम्यानच्या विधीबद्दल सखी आणि सुव्रतने एक खुलासा केला आहे.
आपल्याकडे लग्नाच्यावेळी वधू आणि वराने उखाणा घेण्याची पद्धत असते. मात्र सखी गोखलेने तिच्या लग्नात उखाणाच घेतला नसल्याची गोष्ट समोर आली आहे. नुकतंच ‘लोकमत फिल्मी’ला दिलेल्या मुलाखतीत सखीला लग्नात कोणता उखाणा घेतला होता, याबद्दल विचारण्यात आले. त्यावर सुव्रतने भाष्य केले.
आणखी वाचा : Video : निवेदिता सराफ यांच्या भाचीने विमान प्रवासावेळी मराठीत दिल्या सूचना, व्हिडीओ पाहताच प्राजक्ता माळी, सुकन्या मोने म्हणाल्या…
“सखीने लग्नात उखाणाच घेतला नव्हता. मी तिला जाता जाता कानात एक उखाणा सांगितला होता. तो उखाणाही फारच सोपा होता. मी माझ्या लग्नातील सर्व उखाणे स्वत: क्रिएटिव्ह लिहिले होते”, असे सुव्रत जोशीने यावेळी सांगितले.
“मी सुव्रतच्या घरी एक उखाणा घेतला होता. पण त्याने फार सुंदर उखाणे तयार केले होते. त्या उखाण्यात त्याने आई, माझं कुटुंब या सर्वांचा त्यात समावेश केला होता. मला तो उखाणा आठवत नाही. पण सखीची आता मी काळजी घेईन, जेणेकरुन माझ्या सासूबाईंना इतका वेळ मिळेल की त्या विविध मंडई परिसरात जाऊन खरेदी करु शकतील, अशा आशयाचा तो उखाणा होता”, असे उत्तर सखी गोखलेने यावेळी दिले.
आणखी वाचा : “मला लंडनला खरेदी करता आली नाही, कारण…” प्राजक्ता माळीने सांगितला किस्सा, म्हणाली “माझे पैसे…”
सखी आणि सुव्रत यांची पहिली भेट ही ‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेच्या सेटवर झाली. त्यांनी अमर फोटो स्टुडिओ या नाटकात एकत्र काम केलं. या नाटकादरम्यानच दोघांच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. त्यानंतर सखी शिक्षणासाठी लंडनला गेली. ११ एप्रिल २०१९ रोजी या दोघांनी लग्नगाठ बांधली. सखी आणि सुव्रत यानंतर ‘आठशे खिडक्या नऊशे दारं’ या मालिकेत एकत्र झळकले होते.
मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actress sakhi gokhale suvrat joshi talk about marriage her ukhana nrp