Pahalgam Terror Attack : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे देशभरात संतापाची लाट पसरली आहे. या दहशतवादी हल्ल्यात २६ निष्पाप पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानविरुद्ध अनेक कठोर निर्णय घेतले. अशातच, सोशल मीडियावर पहलगाम हल्ल्याबद्दल विशाखा सुभेदारने ( Vishakha Subhedar ) लिहिलेल्या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. तिची ही पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे.

विशाखा सुभेदारने ( Vishakha Subhedar ) फेसबुकवर ही पोस्ट लिहिली आहे. तिने लिहिलं की, इंटरनेट, सोशल मीडिया सध्या सगळीकडे एकाच विषयावर बोलणं सुरू आहे पहलगाममध्ये घडलेली भयावह घटना… हिंसेला, आतंकवादाला वृत्ती जबाबदार की मती? ‘असं व्हायला नको!’, ‘तसं व्हायला हवं’, ‘यांनी हे करायला हवं’, ‘त्यांनी तसं बोलायला हवं’ पण ज्यांच्यावर तो प्रसंग ओढवला त्यांनी काय करायचं? आपलं माणूस गमावल्याचं दुःख, शोक करायचा आणि जाब विचारायचा तर तो कोणाला? ही गमावलेली माणसं येतील का परत?

पुढे विशाखा सुभेदारने ( Vishakha Subhedar ) लिहिलं, “जात, धर्म, वर्ण, भेद त्याचं केलं जाणारं राजकारण अशा आणि बऱ्याच गोष्टी आहेत. पण एखाद्या निष्पाप माणसाला जीवे मारण्याची वृत्ती ही येते कशी आणि कुठून? ही शिकवण देणारे आणि ती आपल्या चांगल्याचसाठी आहे हे मानणाऱ्यांना कसे थांबवायचे? आनंद आणि विरंगुळा मिळावा म्हणून गेलेले पर्यटक, त्याची ही अशी अवस्था व्हावी… हे सगळंच अस्वस्थ करणारं आहे…गर्दी दिसली की एक अनामिक भीती वाटते..खूप खदखद आहे मनात.. राहून राहून सारखे तेच विचार येतात…समजा आपण त्या जागी असतो तर?”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, विशाखा सुभेदारच्या ( Vishakha Subhedar ) कामाबद्दल बोलायचं झालं तर, ती सध्या ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘शुभविवाह’ मालिकेसह विविध चित्रपट, नाटकात पाहायला मिळत आहे. विशाखाचं नवीन नाटक ‘द दमयंती दामले’ रंगभूमीवर जोरदार सुरू आहे. संतोष पवार लिखित-दिग्दर्शित ‘द दमयंती दामले’ या नव्या नाटकात विशाखा सुभेदार मुख्य भूमिकेत आहे. याशिवाय पल्लवी वाघ-केळकर, सुकन्या काळण, सागर खेडेकर, संजीव तांडेल, वैदेही करमरकर, क्षितिज भंडारी, संजय देशपांडे हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत.