Bigg Boss Marathi Fame Actor : सध्या राज्यात हिंदी-मराठी भाषा वादावरून वांदग सुरू आहे. अशातच एका व्यावसायिकाने या भाषा वादात उडी घेतली. मुंबईतील प्रसिद्ध व्यावसायिक सुशील केडिया यांनी त्यांच्या सोशल मीडियावर जाहीरपणे सांगितले की, ‘मी मराठी भाषा शिकणार नाही’. त्यात पुण्यातील एका कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही ‘जय गुजरात’ अशी घोषणा केली. त्यामुळे या वादात आणखी भर पडली आहे. सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जात आहे.
मराठी-हिंदी भाषेच्या या वादंगात अनेक कलाकारांनी त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्यात. अशातच आता मराठी अभिनेता अक्षय केळकरनेही याबद्दल पोस्ट शेअर केली आहे. अक्षयने या पोस्टमधून ‘तुम्ही ज्या राज्यात वास्तव्यास आहात, त्या राज्याची भाषा बोलण्याची अपेक्षा करण्यात चूक कशी असू शकते’ असा प्रश्न उपस्थित केला आहे. तसंच ‘ते येत नसल्यास सौजन्यपूर्वक मान्य करावे’ असं मतही त्याने व्यक्त केलं आहे.
सोशल मीडियावरील या पोस्टमध्ये अक्षय असं म्हणतो, “माझ्या आजुबाजूला आणि माझ्या व्यवसायात असे माझे अनेक मित्र-मैत्रिणी आणि परिचित लोक आहेत, जे जन्माने अमराठी आहेत. केवळ चार ते पाच वर्षांपासून ते महाराष्ट्रात आणि मुंबईत वास्तव्य करत आहेत. परंतू ते खूप छान मराठी बोलतात. त्याचबरोबर अशीही काही माणसे आहेत, ज्यांना बरीच वर्ष इथे राहूनही संपूर्ण शुद्ध मराठी शिकायला जमत नाहीये, तरीही तोडकी मोडकी का असेना, पण मराठीत बोलायचा प्रयत्न करतात.”
यानंतर अक्षयने पोस्टमध्ये असं म्हटलंय, “जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टीबद्दल आदर असतो, तेव्हा तो आपल्या कृतीतून, प्रयत्नांतून स्पष्ट दिसत असतो. तुम्ही ज्या राज्यात वास्तव्याला आहात, त्या राज्याची भाषा तुम्हाला बोलता येणं ही अपेक्षा खरंच इतकी मोठी आहे? तुम्हाला शुद्ध मराठीची कोणतीही परीक्षा द्यायची नाहीये, तर फक्त गरजेपुरते मराठी बोलता येईल इतकीच अपेक्षा आहे.”
यापुढे अक्षयने म्हटलंय, “प्रत्येक राज्य जर तिथे बोलल्या जाणाऱ्या भाषेच्या आधारेच ठरविण्यात आला आहे, तर त्या त्या राज्यात ती ती भाषा बोलली जावी ही अपेक्षा चूक कशी काय असू शकते? तरीही, कोणत्याही कारणामुळे, जर इथली भाषा बोलता येत नसेल, तर किमान सौजन्यपूर्वक ही बाब मान्य करून, मुजोरी न दाखवता ही संवाद साधता येऊ शकतो.”
यानंतर अक्षय असं म्हणतो, “इथे प्रत्येक जण आपापल्या परीने कमवत आहे, कमवायलाच आलेला आहे. प्रत्येक जण कष्ट करून आपापल्या पद्धतीने जगतो आहे. तेव्हा, स्वतःच्याच जगण्यासाठी मिळवलेल्या उत्पन्नाचा आणि जमवलेल्या संपत्तीचा हा कोणता माज? जरी तुमचा जन्म इथे झाला नसला तरी, आपल्या कर्मभूमीबद्दल किमान आदर तरी असावा.”
दरम्यान, अक्षयची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेकांनी या अक्षयच्या या पोस्टला समर्थन दिलं आहे. अनेकांनी अक्षयच्या या पोस्टखाली “खूप छान”, “अगदी बरोबर”, “योग्य आणि समर्पक” अशा शब्दांत त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. तर या विषयावर अक्षयने त्याचं मत व्यक्त केल्याने अनेकजण त्याचं कौतुकही करत आहेत.