‘खुलता कळी खुलेना’ मालिकेतून मानसी देशपांडेच्या भूमिकेतून अभिनेत्री मयुरी देशमुख(Mayuri Deshmukh) घराघरांत पोहोचली. याबरोबरच इमली या मालिकेतूनही अभिनेत्रीला वेगळी ओळख मिळाली. आता अभिनेत्री मयुरी देशमुखने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या करिअरविषयी, अभिनय क्षेत्रात येण्याच्या निर्णयाविषयी याबरोबरच काही कलाकारांबरोबर असलेल्या नात्याविषयी तिने वक्तव्य केले आहे. तसेच, अभिनेत्रीने तिच्या चांगल्या-वाईट काळाबद्दलदेखील वक्तव्य केले आहे.

आपल्यात किती क्षमता…

अभिनेत्री मयूरी देशमुखने नुकतीच सुलेखा तळवलकर यांच्या दिल के करीब या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत सुलेखा तळवलकर यांनी मयूरीला विचारले की, तू आयुष्यात खूप चढ-उतार बघितलेस. खूप चांगल्या-वाईट प्रसंगांना सामोरी गेली आहेस. तू ते कसं हॅण्डल करतेस? यावर बोलताना मयुरी देशमुखने म्हटले, “मुळात अशी परिस्थिती मी फक्त हॅण्डल करते, असं मी म्हणू शकणार नाही. मला असं वाटतं की, वेळोवेळी बऱ्याच लोकांची मला मदत झाली आहे. माझा एक सकारात्मक दृष्टिकोन आहे, त्याची मदत होते. जेव्हा जेव्हा खच्चीकरण होतं, तेव्हा ती ऊर्जा कुठून तरी घ्यावी लागते, असं मला वाटतं. माझ्या आयुष्यात चांगल्या ज्या घटना घडल्या आहेत, त्याचंही श्रेय मी एकटी घेऊ शकत नाही आणि ज्या वाईट घटना घडल्या आहेत, त्यातून मी बाहेर पडले, त्याचंही माझं श्रेय नाही. कारण- मला असं कधी कधी वाटतं की, देवाला माहितेय की, आपल्यात किती क्षमता आहे किंवा आपण कशातून बाहेर पडू शकू की नाही, आपल्यात केवढी शक्ती आहे. त्याच पद्धतीची, तीच परीक्षा देव तुम्हाला देतो. त्या वेळेस आपल्याला वाटतं की, काय अन्यायकारक आहे किंवा असं कसं, एवढी मोठी परीक्षा माझ्या वाट्याला कशी काय? पण त्या वेळेस त्याने माझ्या आजूबाजूला खूप चांगली लोकं पेरली होती.”

पुढे बोलताना अभिनेत्रीने म्हटले, “उदाहरण द्यायचं, तर मला त्या क्षणी किंवा काही काळात असं वाटलं होतं की, आपल्याला ना डोंगरावरून खाली दरीत कोणीतरी ढकललंय आणि खाली पडताना जे काही अनुभव येतात की ती भीती, हतबलता सगळं मी अनुभवलंय. पण, खाली ना एक जाळी ठेवली होती आणि मी त्या जाळीवर पडले. त्यामुळे मला लागलं नाही. पण, मी ते पडणं अनुभवलं. मला असं वाटतं, ती जी जाळी होती, ती तुम्ही ज्या गोष्टीला मानता ती आपण ती दैवी शक्ती म्हणूया. काही लोक आशावाद म्हणतात; पण ती खूप मजबूत अशी जाळी होती. अर्थात, तो मित्रपरिवार असेल किंवा माझं कुटुंब असेल. आता जे मला रेकीचं पुस्तकं दिलंय, तसंच अचानक एक रेकी मास्टर माझ्या आयुष्यात आली होती. जी अचानक मला मुलगी मानू लागली. तिनं मला नि:स्वार्थीपणे मला साथ दिली.”

“मला असं वाटतं की त्या जाळीमुळे आणि मी स्वत: प्रयत्न सोडले नाहीत, जेव्हा जेव्हा मला वाटलं की मी खड्ड्यात चाललीय, काळोखात कुठेतरी चाललीय, आपल्याला कळत नाहीये की काय होतंय. मी दिशाहीन होतेय, असं जेव्हा वाटायला लागतं, तेव्हा मी खूप प्रयत्न करते. मी सगळ्या पातळ्यांवर प्रयत्न करते. खूप चांगले लोक होते; पण मी जर प्रयत्न केले नसते, तर त्याचा काही उपयोग झाला नसता. ते लोक ५० पावलं आली, तर ५० पावलं तुम्हालाही चालावी लागतात. ते बळ, ती शक्ती एकवटावी लागते. ती एकवटण्यासाठी सध्या खूप माध्यमं आहेत. आपण म्हणतो की, सोशल मीडियाचा गैरवापर होतो. तर त्याचा चांगला वापर हाही आहे की मला माझ्या वाईट काळात खूप चांगल्या लोकांची साथ मिळाली. यूट्यूबवरून बी. के. शिवानी, सद्गुरू किंवा रविशंकर असतील किंवा आणखी कोणी, जे आपलं मनोबल वाढवण्यासाठी मदत करतात. त्या सगळ्या लोकांची मदत आणि स्वत:ची इच्छाशक्ती, माझं रूटीन, मी स्वत:ला नीट ठेवण्यासाठी ज्या प्रॅक्टिसेस करते, त्या सगळ्यांच्या मदतीने मी आता सगळ्यात जास्त ऊर्जा व सकारात्मकता आज माझ्याकडे आहे. कारण- ती आता कमावलेली आहे. माझं खूप स्पष्ट ध्येय आहे की, मला फक्त जगायचं नाहीये, मला खूप सुंदर आयुष्य जगायचं आहे. त्यासाठी तुम्हाला स्वत:वर काम करावं लागतं, जे मी कायम करते”, असे म्हणत जेव्हा आयुष्यात चढ-उतार आले, तेव्हा अभिनेत्री त्याला कशी सामोरी गेली, यावर तिने वक्तव्य केले आहे.

Story img Loader