Muramba Upcoming Twist: ‘मुरांबा’ या मालिकेचा मोठा चाहतावर्ग आहे. या मालिकेत येणारे ट्विस्ट, रमा-अक्षयची केमिस्ट्री, त्यांच्यातील प्रेम, दुरावा हे सगळे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असतात.
काही दिवसांपूर्वी रमाने दुसरे लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यादरम्यान, अक्षयला जाणीव झाली की, तो रमाशिवाय इतर कोणाचाही विचार करू शकत नाही. तो फक्त रमावरच प्रेम करतो. त्याला रमा त्याच्या पुन्हा आयुष्यात हवी आहे.
‘मुरांबा’ मालिकेत नेमकं काय घडणार?
अक्षयने रमाची समजूत घालण्याचा प्रयत्न केला; पण रमाने तिचा निर्णय बदलण्यास नकार दिला. रमाने लग्न मोडण्यास स्पष्ट नकार दिल्यानंतर अक्षय निराश झाला होता. पण, त्यावेळी हताश झालेल्या अक्षयला त्याच्या कुटुंबाने म्हणजेच मुकादम कुटुंबाने साथ दिली. रमाला पुन्हा मुकादमांच्या घरी आणण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी सगळे त्याच्याबरोबर आहेत, असे सांगून त्याला आश्वस्त करण्यात आले.
त्यानंतर अक्षयचा लूक बदलला. त्याच्या लूकने लक्ष वेधले. त्याबरोबरच ते इतरही प्रयत्न करताना दिसत आहेत. आता या सगळ्यात स्टार प्रवाहने मुरांबा मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे.
मुरांबा मालिकेच्या प्रोमोममध्ये पाहायला मिळते की, रमा तिच्या होणाऱ्या नवऱ्यासह म्हणजेच साईसह मुकादम कुटुंबात आली आहे. त्यांना जेवणासाठी बोलावले असल्याचे प्रोमोमध्ये दिसत आहे.
साई व रमा जेवायला बसले आहेत. त्यावेळी इरावती रमाला म्हणते, “रमा, तुझ्या नवऱ्याला छान घास भरव. म्हणजे होणाऱ्या नवऱ्याला.” त्यानंतर रमा साईला घास भरवत असते. तितक्यात तिथे मधेच अक्षय येतो आणि तो रमाच्या हातातील घास खातो. अचानक अक्षयला पाहून रमा आणि साई दोघांनाही धक्का बसतो. रमा त्याला रागाने “तुम्ही?”, असे म्हणते आणि त्याने तिचा धरलेला हात सोडवून घेते. साई त्याला विचारतो, हे तू काय करतोयस?” त्यावर अक्षय म्हणतो, “लग्नघरामध्ये जे कोणी काम करतात ना, त्यांना चांगली बायको मिळते आणि मला बायको म्हणून हीच हवी आहे. म्हणजे हिच्यासारखीच कोणीतरी हवी आहे.” त्यानंतर अक्षय म्हणतो, “आता रमाच्या लग्नात फक्त मुकादमांची वरात.”
आता अक्षय रमाचे मन जिंकणार का, तिचे हे लग्न थांबवू शकणार का, इरावती आणखी काय कारस्थान करणार आणि मालिकेत पुढे काय होणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
