नाटक, चित्रपट, मालिका, वेब सीरिज ही मनोरंजनाची महत्त्वाची साधने आहेत. विशेषत: टीव्हीवर प्रदर्शित होणाऱ्या मालिकांचे प्रेक्षकांच्या आयुष्यात वेगळेच स्थान असते. प्रेक्षकांच्या दररोजच्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग या मालिका बनतात. त्यापैकी काही अत्यंत आवडत्या असतात. काही पात्रं प्रचंड लाडकी असतात. अनेकदा एखादी मालिका संपत असताना प्रेक्षकांना वाईटही वाटते. काही मालिका जेव्हा कमी काळात अचानक संपल्यासारख्या वाटतात, तेव्हा अमुक एखादी मालिका इतक्या लवकर का संपवली, असाही प्रश्न पडतो. आता अभिनेते अभय कुलकर्णी (Abhay Kulkarni) यांनी एका मुलाखतीत यावर वक्तव्य केले आहे.
अभय कुलकर्णी यांनी नुकतीच अल्ट्रा बझ मराठी या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. त्या मुलाखतीत त्यांनी म्हटले, “आजकाल कास्टिंग डायरेक्टरची संख्या खूप झाली आहे. त्यामध्ये खूप लोकांचा सहभाग असतो. पूर्वी माझ्यासाठी कांचन नायक नावाचा दिग्दर्शक दीड महिना थांबला होता. आज चॅनेलला ठणकावून कोण सांगू शकतं? दिग्दर्शकाचंच माहीत नाही की तो आज आहे की नाही? खूप चांगले दिग्दर्शक आपल्याकडे आहेत. मी एक मालिका करीत होतो, त्याचा एक दिग्दर्शक होता. त्याला नॅशनल अवॉर्ड मिळालं होतं. तर प्रॉडक्शनवाले म्हणाले की, बघूयात की नॅशनल अवॉर्ड जिंकलेला दिग्दर्शक कसा काम करतोय? आता जी बदललेली परिस्थिती आहे, ती खूप भयानक आहे.”
आता धाक कमी झाला आहे का? कारण- पूर्वी दिग्दर्शकाचा शब्द अंतिम मानला जायचा. आजकाल दिग्दर्शकापेक्षा बाकीचे लोकच गोष्टी जास्त ठरवतात. त्यावर बोलताना अभय कुलकर्णी यांनी म्हटले, “मला वाटतं की, इतरांनी निर्णय घ्यायला हरकत नाही. पण, त्यांना तेवढी अक्कल असायला हवी. ती अक्कल नसताना गोष्टी ठरवल्या जातात. समोरच्या माणसावर विश्वास ठेवला जात नाही. तुम्ही लोकांना (प्रेक्षकांना) गृहीत धरता. आम्ही दाखवू तेच लोक बघतील, हा मूर्खपणा आहे आणि मग तुम्ही कलाकारांवर दबाव टाकता की, तुम्हाला टीआरपी (TRP) मिळत नाहीये. आता कॉर्पोरेट प्रकार खूप आलेला आहे.”
सध्याच्या लिखाणाबद्दल बोलताना अभय कुलकर्णी यांनी म्हटले, “ते काय लिहितात, हे मला माहीत नाही. त्यांना कशाचा पत्ताच नसतो. दुर्दैवानं मी लेखकाच्या घरातील आहे. मी लेखकांच्या वातावरणात वाढलेला माणूस आहे.” पुढे त्यांनी याबद्दल अधिक बोलताना म्हटले, “टेलिव्हिजन इंडस्ट्री ही या लोकांमुळे गाळात चालली आहे. माझं स्पष्ट मत आहे की, कुठलीही मालिका बंद पडली की, ती चॅनेलमुळे बंद पडते. तुम्ही टीआरपीची कारणं सांगू नका. टीआरपी ही कलाकारांवर नसते. टीआरपी ही तुमच्या कंटेटवरती असते. कुठलाही सिनेमा चालणं हे कंटेटवरती असतं. मग तो काय बजेटचा आहे, यानं फरक पडत नाही. अनेकदा १०० कोटींचे सिनेमेदेखील आपण पडलेले बघितलेले आहेत.”
दरम्यान, अनेक मालिका या चालणाऱ्या मालिकांची कॉपी करतात. त्यामध्ये कलाकार, दिग्दर्शक पिसले जातात. प्रॉडक्शनला काही फरक पडत नाही, असेही अभय कुलकर्णी यांनी म्हटले आहे. अभय कुलकर्णी यांनी रुस्तम, स्टार बेस्ट सेलर्स, कमिने, लज्जा, संजू, दोघी, ले चल अपने संग या चित्रपटांत काम केले आहे. तसेच त्यांनी मराठी मालिकांमध्येही काम करीत प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.