‘शार्क टँक इंडिया सीझन २’चा फिनाले वीक सुरू आहे. या कार्यक्रमाने फार कमी काळात प्रेक्षकांवर पकड घेतली आहे. भारतातील वेगवेगळे नवे उद्योग आणि संकल्पना यांना या कार्यक्रमामुळे चालना मिळते तसेच देशातील मोठमोठ्या कंपन्या चालवणारे उद्योजक लोकांना मदत करतात. या कार्यक्रमातील स्पर्धकांप्रमाणेच यातील शार्क्सचीसुद्धा तरुणाईत प्रचंड क्रेझ आपल्याला पाहायल मिळते.
पहिल्या सीझनमध्ये इतर शार्क्सबरोबर ‘भारत पे’चा को फाऊंडर अशनीर ग्रोव्हरची जबरदस्त चर्चा झाली. अशनीर ज्या पद्धतीने उद्योजकाची कानउघडणी करायचा त्यासाठी तो प्रचंड लोकप्रिय होता, शिवाय त्याचे भरपुर मीम्सही व्हायरल झाले. या दुसऱ्या सीझनमध्ये अशनीर नसल्याने बरेच चाहते निराश होते, पण हा सीझनसुद्धा चांगलाच हीट ठरला. नुकतंच एका खासगी समारंभादरम्यान ‘शार्क टँक इंडिया’चं मिनी रियुनियन झालं, या सोहळ्यात ‘बोट’ कंपनीचा फाऊंडर अमन गुप्ता आणि अशनीर ग्रोव्हर यांची भेट झाली.
सुप्रसिद्ध ‘ओयो’ कंपनीचा फाउंडर रितेश अग्रवालच्या लग्नाच्या रीसेप्शनमध्ये या दोघांची भेट झाल्याचे फोटो व्हायरल झाले आहेत. अमन गुप्ताने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर फोटो शेअर करत रितेश आणि त्याच्या बायकोला शुभेच्छा दिल्या. इतकंच नाही तर अशनीर आणि इतर मित्रमंडळींसह फोटोदेखील शेअर केला.
आणखी वाचा : ‘मिस्टर इंडिया’ चित्रपटात काम करण्यास इच्छुक होता आमिर खान; सतीश कौशिक यांनी अभिनेत्याला दिलेला नकार
या दोघांचा एकत्र फोटो पाहून त्यांच्या चाहत्यांनी कॉमेंट करत आनंद व्यक्त केला. एका युझरने कॉमेंट केली की, “अशनीर आणि अमन एकत्र आम्ही तुम्हाला प्रचंड मिस करत आहोत” तर आणखी एका युझर अशनीरचा खास डायलॉग कॉमेंट केला, युझर म्हणाला, “सब दोगलापन है.” इतकंच नाही तर अशनीरला दुसऱ्या सीझनमध्ये सहभागी न होता आल्याचं दुःख आहे का असा प्रश्नसुद्धा चाहत्यांनी विचारला.