Sharmila Shinde on Pudhcha Paaul Season 2: काही मालिका वर्षानुवर्षे प्रेक्षकांच्या मनात घर करून राहतात. मालिका संपल्यानंतरही त्याचा पुढचा भाग पाहायला मिळेल का, अशी उत्सुकता चाहत्यांच्या मनात असते. पुढचं पाऊल ही त्या मालिकांपैकी एक आहे.
२०११ साली ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर ही मालिका प्रदर्शित होत होती. मालिकेत कल्याणी, आक्कासाहेब ऊर्फ राजलक्ष्मी, रूपाली, कांचनमाला, पिंटू मामा, सोहम सरदेशमुख, रोहित सरदेशमुख ही पात्रे लोकप्रिय ठरली होती. सगळीकडे दरारा असलेल्या आक्कासाहेब, प्रेमळ कल्याणी आणि कल्याणीला त्रास देणारी रूपाली ही पात्रे प्रेक्षकांची लाडकी झाली होती.
‘पुढचं पाऊल’ मालिकेत कल्याणी ही भूमिका अभिनेत्री जुई गडकरी यांनी साकारली होती. आक्कासाहेबांच्या भूमिकेत अभिनेत्री हर्षदा खानविलकर दिसल्या होत्या. रूपालीच्या भूमिकेत अभिनेत्री शर्मिला शिंदे, सोहम सरदेशमुखच्या भूमिकेत अभिनेता आस्ताद काळे आणि रोहित सरदेशमुखच्या भूमिकेत सुयश टिळक दिसला होता. कांचनमाला रणदिवे ही भूमिका अभिनेत्री सुप्रिया पाठारे यांनी साकारली होती.
शर्मिला शिंदे ‘पुढचं पाऊल’ मालिकेबद्दल म्हणाली…
आता अभिनेत्री शर्मिला शिंदेने नुकतेच सोशल मीडियावर ‘आस्क मी एनिथिंग’ हे सेशन घेतले. या सेशनमध्ये चाहत्यांनी तिला अनेकविध प्रश्न विचारले. नवरी मिळे हिटलरला ही मालिका खरंच संपणार आहे का, नाटकाचे प्रयोग कुठे होणार, या मालिकेनंतर ती कोणत्या चित्रपटात किंवा मालिकेत दिसणार, असे अनेक प्रश्न तिला विचारले. शर्मिला शिंदेनेदेखील या सगळ्याची उत्तरे दिल्याचे पाहायला मिळाले.

त्याबरोबरच तिला ‘पुढचं पाऊल’ या मालिकेचा दुसरा सीझन आला पाहिजे, असे एका चाहत्याने म्हटले. त्यावर शर्मिलाने लिहिले, “पुढचं पाऊल हा खूप अनोखा कार्यक्रम होता. त्याची बरोबरी होऊच शकत नाही. सीझन २ आधीच यायला पाहिजे होता.” आणखी एका चाहत्याने विचारले की, तुझं आक्कासाहेब आणि कांचनमाला यांच्याबरोबरचे बॉण्डिंग कसे आहे? त्यावर उत्तर देताना शर्मिला शिंदेने लिहिले, “खऱ्या आयुष्यात आक्कासाहेब माझ्या आईसारख्या आहेत आणि कांचनमाला म्हणजेच सुप्रियाताई माझी जवळची मैत्रीण आहे.” पुढचं पाऊल या मालिकेने २०१७ साली प्रेक्षकांचा निरोप घेतला.

दरम्यान, शर्मिला शिंदे सध्या नवरी मिळे हिटलरला या मालिकेत दुर्गा या भूमिकेत दिसत आहे. या मालिकेतील तिच्या या भूमिकेला प्रेक्षकांचे प्रेम मिळताना दिसत आहे. आता लवकरच ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.