अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत काही दिवसांपासून चर्चेत आली आहे. याचं कारण म्हणजे नुकतंच शर्मिष्ठा राऊत व तिचा नवरा तेजस देसाई यांनी काही दिवसांपूर्वीच एका गोंडस मुलीचं स्वागत केलं आहे. २० एप्रिल रोजी शर्मिष्ठा राऊत व तेजस देसाई यांच्या मुलीचं बारसं पार पडलं. दोघांनी त्यांच्या मुलीचं नाव रुंजी, असं ठेवलं. रुंजीच्या बारशाला कलाविश्वातील अनेक कलाकार उपस्थित होते.
शर्मिष्ठा व तेजस यांनी आपल्या नवजात बालिकेच्या बारशाला मराठमोळा लूक केला होता.तर त्यांच्या मुलीच्या बारशातील गोड फोटोज सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. यावेळी कलाकारांसह शर्मिष्ठाच्या चाहत्यांनीदेखील तिचं अभिनंदन केलं. अशातच आई झाल्यानंतर शर्मिष्ठाने नुकतीच ‘हंच मीडिया’ला मुलाखत दिली आहे. त्यामध्ये तिने पालकत्वाबद्दलचे तिचे विचार मांडले आहेत. त्यामध्ये तिनं आता रुंजीला जन्म दिला असला तरी यापूर्वीसुद्धा आईपण अनुभवलं असल्याचं म्हटलं आहे. शर्मिष्ठानं चिकू नावाच्या तिच्या पाळीव प्राण्याचा मुलीप्रमाणे सांभाळ केल्याचं म्हटलं आहे. तिचं पालन-पोषण करतानाच तिला आई झाल्याचा आनंद मिळाला असल्याचं तिनं सांगितलं आहे.
त्याशिवाय शर्मिष्ठानं यापूर्वी दोन मुलांना दतक घेतल्याचंही सांगितलं आहे. शर्मिष्ठानं मनीषा व आशीष अशा दोन मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली होती. मनीषाचे आई-वडील आहेत; परंतु त्यांची परिस्थिती चांगली नसल्यानं शर्मिष्ठानं तिच्या शालेय शिक्षणाची जबाबदारी घेतली होती. त्यासह आशीष हा जन्मापासून अनाथ असून, तिनं त्याच्या पहिली ते दहावीपर्यंतच्या शिक्षणाचा खर्च पुरवला असून आशीषचं शालेय शिक्षण पूर्ण झाल्याचं तिनं यामध्ये नमूद केलं आहे. याचदरम्यान शर्मिष्ठानं मुलांना जन्म देण्याबाबतचं तिचं मत मांडलं आहे. तिनं या मुलाखतीतमध्ये असं म्हटलं आहे, “तुमच्या म्हातारपणाची काठी होईल या विचारानं मुलांना जन्माला घालू नका.”
“तुम्हाला तुमचं कुटुंब हवं असेल, मुलं झाल्यानं आई-बाबा होण्याचा आनंद उपभोगायचा असेल, तर मुलांना जन्म द्या. पण, तो किंवा ती आमच्या म्हातारपणाचा आधार होईल, आमचा सांभाळ करील या विचारांनी मुलांना जन्म देऊ नका. कारण आपण आपल्या स्वार्थासाठी मुलांना अडकवून ठेवू शकत नाही. उद्या त्यांना जर अमेरिकेत कायमचं स्थायिक व्हायचं असेल, तर तुम्ही नका जाऊ. आम्ही एकटे इथे कसे राहणार, असं म्हणून त्यांना थांबवणार आहात का?.
पुढे एकंदरीत याबाबत बोलाताना तिनं असं म्हटलं आहे, “कुठलाही स्वार्थ न ठेवता, आपल्या म्हातारपणाचा आधार होईल म्हणून नाही; तर केवळ कुटुंब हवं असेल, तो आनंद अनुभवायचा असेल, तरच मुलांना जन्म देणं योग्य आहे.”