Spruha Joshi Shares Poem : गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात हिंदी भाषेच्या सक्तीचा विषय चांगलाच चर्चेत होता. अशातच आता हिंदी सक्तीचा जीआर राज्य शासनाच्या वतीनं मागे घेण्यात आला आहे. रविवारी (२९ जून) पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत जीआर मागे घेण्याचा निर्णय घेतला गेला. तसंच सरकारने शिक्षणतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्याचीही घोषणा केली.

काही मोजक्या कलाकार मंडळींनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत हिंदी सक्तीच्या निर्णयाला विरोध केला होता. हेमंत ढोमे, किरण माने, वैभव मांगले, सचिन गोस्वामी, सयाजी शिंदे, मकरंद अनासपुरे, केदार शिंदे तसंच रवी जाधव या कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत हिंदी सक्तीला विरोध केला होता. अशातच हिंदी सक्तीचा जीआर रद्द करताच मराठी अभिनेत्रीने कविता शेअर केली आहे.

मराठी अभिनेत्री स्पृहा जोशी ही एक उत्तम अभिनेत्री असण्याबरोबरच कवयित्रीसुद्धा आहे. सोशल मीडियावर ती विविध विषयांवरील कविता शेअर करत असते. अशातच स्पृहाने हिंदी भाषा सक्तीचे जीआर रद्द करताच कविता सादर केली आहे. तसंच या कवितेचा व्हिडीओ तिने आपल्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. स्पृहाने शेअर केलेल्या या कवितेचं शीर्षक आहे – ‘मायबोली’.

स्पृहा जोशी इन्स्टाग्राम व्हिडीओ

ज्ञानोबांची अमृतबोली
ज्ञानाची रसगंगा
मायबोलिच्या उरे अंगणी
आता केवळ दंगा

परंपरेतुन अभंग झाली
अमुची मायमराठी
अभिजात तिचे सौंदर्य देखणे,
कायम अमुच्या पाठी.

परंतु चाले खेळ अनोखा
महाराष्ट्र देशा
अपुल्या डोळ्यासमोर हरवे
आपुलीच हो भाषा.

सत्ताधारी कुणी विरोधी
मोठी राजघराणी
हताश होऊन बघे मराठी
उदास केविलवाणी!

मंत्रालय वा हो न्यायालय
दबकत पाउल टाकी..
अधिक- उणे च्या गणितामध्ये
उरली केवळ ‘बाकी!’

श्रेय लाटुनी मराठिचे
वर उद्धाराच्या बाता
मुळी न वाटे लाज तयांना
नक्राश्रू ढाळता.

राजनीतिच्या पटावरूनी
हलती प्यादी सारी,
उगा उमाळे, कढ हे खोटे
बोलायाची चोरी!

दुस्वासा कुठल्या भाषेच्या
मुळी नसावा थारा
सक्तीने पण होऊन जातो
जीव उगाच बिचारा!

कोणासाठी कोणा कारण
हा कट रचला जातो..
एकशे पाच हुतात्म्यांचा
श्वास पुन्हा गुदमरतो..

मायबोलिच्या पुनरुथ्थाना
असेच काही व्हावे
ज्ञानोबांनी सदेह आता
मराठदेशी यावे!”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, स्पृहाने शेअर केलेली ही कविता अनेकांच्या पसंतीस पडली आहे. केवळ चाहतेच नाहीत, तर कलाकारांनीसुद्धा स्पृहाच्या कवितेला कमेंट्सद्वारे दाद दिली आहे. अविनाश नारकरांनी “व्वा व्वा स्पृहे…. खूप खूपच छान व्यक्त झालीयेस बाळा” अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तसंच इतरांनीही “व्वा… काय सुंदर लिहलंस खूपच छान”, “एक भयानक सत्य”, “ताई तू अगदी मनातलं मांडलंस” अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.