अभिनेत्री सुकन्या मोने यांनी आजवर अनेक मालिका, चित्रपट व नाटकांमध्ये काम केलं आहे. या माध्यमांतून त्यांनी अनेक वैविध्यपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर त्यांच्या अभिनयाची छाप सोडली. आता लवकरच सुकन्या मोने ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील आगामी मालिकेत पाहायला मिळणार आहेत. सुकन्या या ‘कोण होतीस तू काय झालीस तू’ या नव्या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारणार आहेत.
ही मालिका येत्या २८ एप्रिलपासून सुरू होणार आहे. ‘कोण होतीस तू काय झालीस तू’ या मालिकेतून सुकन्या मोने पुन्हा एकदा छोट्या पडद्यावरून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्यामध्ये त्या अभिनेता मंदार जाधवच्या आईची भूमिका साकारणार आहेत. मालिकेत मंदार जाधव व अभिनेत्री गिरिजा प्रभू मुख्य भूमिकांत झळकणार आहेत. तर मालिकेच्या प्रमोशननिमित्त माध्यमांना मुलाखत देताना सुकन्या यांनी मालिकेतील त्यांच्या भूमिकेवर मुलीने दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल सांगितले आहे.
‘अलट्रा मराठी बझ ला दिलेल्या मुलाखतीत मुलीच्या प्रतिक्रियेबद्दल बोलताना त्या म्हणाल्या, “लेकीला माझी भूमिका आवडलीच आहे. ती आता चार दिवसांनंतर परदेशात जाईल. त्यामुळे मी व्यग्र आहे कामात हे बघून तिला बरं वाटेल आणि ती म्हणाली की, आता अजून कोणीतरी तुझ्याबरोबर आहे. त्यामुळे ते आता तुझी काळजी घेतील आणि तू कामात व्यग्र असलीस की, मी तिकडे शांत असेन. कारण- तू कशात तरी मन रमवतेयस”.
पुढे मुलीबद्दल बोलताना त्या म्हणाल्या, “माझी मुलगी मस्करीत म्हणाली की, मालिकेचं नाव तुझ्यावरून ठेवलंय का? कोण होतीस तू काय झालीस तू”, तिच्या वडिलांकडून हा गुण तिच्यात आलाय, असं म्हणत त्यांनी लेकीची प्रतिक्रिया सांगितली. यासह त्यांना त्यांचे पती अभिनेते संजय मोने यांच्या प्रतिक्रियेबद्दलही विचारण्यात आलं होतं. त्याबद्दल बोलताना त्या म्हणाल्या, “संजय टीव्ही कधीच बघत नाही. तो त्याची स्वत:ची मालिका किंवा कोणतंच काम तो फारसं बघत नाही. पण मी जेव्हा त्याला माझं काम दाखवते तेव्हा तो नेहमी त्यावर त्याची प्रतिक्रिया देतो. किंवा बाहेर जर कोणी माझं कौतुक केलं, टीका केली तर तो लगेच येऊन मला सांगतो. चांगलं काम केलं असशील, त्यामुळे तुझं कौतुक होतंय बाहेर. तू चांगलं काम केलंय आणि कोणी टीका केली, तर तू काही वेगळं केलंयस का की, लोकांना ते आवडलं नाही, असंही तो म्हणतो.”
दरम्यान, सुकन्या मोने यांची आगामी मालिका कोण होतीस तू काय झालीस तू यामध्ये अभिनेते वैभव मांगले, गिरिजा प्रभू, मंदार जाधव, साक्षी गांधी, अमित खेडेकर हे कलाकार पाहायला मिळणार आहेत. येत्या २८ एप्रिलपासून ही मालिका सुरू होणार असून, रात्री ८ वाजता प्रेक्षकांना ही मालिका पाहता येणार आहे.