Zee Marathi Navri Mile Hitlerla Serial Off Air : ‘नवरी मिळे हिटलरला’ ही मालिका गेल्या काही दिवसांपासून चांगलीच चर्चेत आहे. साधारण वर्षभरापूर्वी म्हणजे १८ मार्च २०२४ रोजी ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली. या निमित्ताने पहिल्यांदाच वल्लरी विराज आणि राकेश बापट यांची फ्रेश जोडी प्रेक्षकांना छोट्या पडद्यावर पाहायला मिळाली. या मालिकेला अल्पावधीतच प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. याशिवाय २०२४ च्या ‘झी मराठी’ पुरस्कार सोहळ्यात या मालिकेने अनेक पुरस्कार देखील पटकावले होते.
मात्र, काही दिवसांपूर्वीच ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिका अवघ्या वर्षभरात प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचं वृत्त समोर आलं आहे. आता मालिका संपणार असल्याने या मालिकाचा चाहतावर्ग नाराज झाला आहे. मालिकेच्या काही चाहत्यांनी एक्सवर ( पूर्वीचं ट्वीटर ) “Dont End NMH” असा ट्रेंड देखील सुरू केला आहे. पण, आता यामधील कलाकारांनीच लवकरच ही मालिका संपणार असल्याच्या बातम्यांना दुजोरा दिला आहे.
सानिका काशीकर, भूमिजा पाटील या दोघींपाठोपाठ या मालिकेची मुख्य खलनायिका शर्मिला शिंदेने मालिका नुकतंच इन्स्टाग्रामवर ‘आस्क मी सेशन’ घेत मालिका संपणार असल्याचं जाहीर केलं आहे.
‘नवरी मिळे हिटलरला’ मालिका पुढे सुरू राहणार आहे का? मालिकेला Extension दिलं जाणार आहे का? यावर अभिनेत्रीने एका चाहत्याला “नाही…” असं उत्तर दिलं आहे.
याशिवाय दुसऱ्या एका नेटकऱ्याने या मालिकेचा दुसरा भाग येईल का? असा प्रश्न शर्मिलाला विचारला. यावर अभिनेत्री म्हणाली, “खरं सांगायचं झालं, तर मला वाटत नाही. या मालिकेचा दुसरा भाग येईल. कारण, जरी दुसरा भाग आणायचा असेल तरी अनेक बदल करावे लागतील.”

याशिवाय मालिकेबद्दल आणखी एका नेटकऱ्याला उत्तर देत शर्मिला लिहिते, “कोणतीही वाहिनी पक्षपाती नसते. प्रत्येकाला व्यावहारिकदृष्ट्या विचार करावा लागतो. प्रत्येक शो किंवा मालिका ही त्यांची स्वत:ची असते. त्यामुळे कधीच कोणाबरोबर पक्षपातीपणा केला जात नाही.”