Navri Mile Hitlerla Serial Promo: ‘नवरी मिळे हिटलरला’ ही लोकप्रिय मालिकांपैकी एक मालिका आहे. या मालिकेतील लीला व एजे ही प्रेक्षकांची आवडती जोडी आहे. त्यांची केमिस्ट्री पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असतात.
मालिकेत दाखविल्याप्रमाणे, एजेची पहिली पत्नी अंतरा जहागीरदारांच्या कुटुंबात आली आहे. त्यामुळे मालिकेत मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे. एजे त्याच्या पहिल्या पत्नीला निवडतील की लीलाची साथ देतील, असा प्रश्न प्रेक्षकांना पडला होता. आता या मालिकेचा एक नवीन प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
एजेने लीलाबाबत घेतलेल्या निर्णयाने सुनांना धक्का बसणार
‘झी मराठी’ वाहिनीने सोशल मीडियावर नवरी मिळे हिटलरला या मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे. घराबाहेर चाललेल्या लीलाला अंतरा अडवते. ती तिच्याशिवाय या घरात राहू शकत नसल्याचे ती म्हणते. दुर्गा लीलाला घरात थांबण्याची परवानगी देते. लीला दुर्गाचे आभार मानते. त्यावर दुर्गा तिला म्हणते की, लगेच खूश व्हायची गरज नाहीये. आमच्या सासूबाई एकट्या पडू नयेत म्हणून मी तात्पुरता माझा निर्णय बदलला आहे.
दुर्गाचे हे बोलणे ऐकूण एजेचा संताप होतो. तो दुर्गा, लक्ष्मी व सरस्वती यांना ताकीद देतो. तो म्हणतो, “यापुढे एक शब्दही तुम्ही लीलाला बोलायचे नाही. लक्षात ठेवा, या घरात शेवटचा शब्द अजूनही माझाच आहे.” तो लीलाचा हात हातात घेत म्हणतो, “जोपर्यंत मी जिवंत आहे, तोपर्यंत मी लीलाला कधीही एकटं सोडणार नाही.”
एजेचे बोलणे ऐकूण दुर्गा, लक्ष्मी व सरस्वती यांना धक्का बसल्याचे दिसत आहे; तर लीला भावूक झाल्याचे दिसत आहे. हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, ‘एजे लीलाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार’, अशी कॅप्शन दिली आहे.
हा प्रोमो पाहिल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी एजेच्या निर्णयाचे कौतुक केले आहे. तर, अनेकांनी कमेंट्स करीत नवरी मिळे हिटलरला ही अनेकांची आवडती मालिका आहे, ती बंद करू नका अशी विनंती केल्याचे दिसत आहे.
नवरी मिळे हिटलरला मालिकेत दाखविल्याप्रमाणे, अंतरा एजेची पहिली पत्नी आहे, जिच्यावर एजेचे खूप प्रेम होते. मात्र, एका अपघातानंतर अंतराचा मृत्यू झाला, असे एजेसह जहागीरदार कुटुंबाला वाटत होते. त्यामुळे एजेच्या आईने त्याचे दुसरे लग्न केले. लीला त्याच्या आयुष्यात आल्यानंतरही तो अंतराच्याच प्रेमात होता. मात्र, लीलाने तिच्या प्रामाणिकपणाने, प्रेमळ स्वभावाने एजेचे मन जिंकले आणि मग एजे तिच्या प्रेमात पडला.
आता अचानक अंतरा त्यांच्या आयुष्यात परतली आहे. मात्र, तिला तिच्या भूतकाळातील काहीच आठवत नाही. ती इतके दिवस एका आश्रमात राहत होती. लीलाला जेव्हा अंतरा आश्रमात राहत असल्याचे समजले, तेव्हा तिने तिला घरी परत आणले. आता मालिकेत पुढे काय होणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.