काही दिवसांपूर्वीच अ‍ॅमेझॉन प्राइमवर प्रदर्शित झालेल्या ‘द फॅमिली मॅन २’ या वेब सीरिजची सध्या इंटरनेटवर तुफान चर्चा सुरु आहे. अनेकांना या सीरिजचा दुसरा भागही प्रचंड आवडला आहे. मात्र या मालिकेमध्ये प्रेक्षकांना सर्वात खटकणारी गोष्ट ठरतेय ती म्हणजे मुख्य भूमिका साकारणाऱ्या श्रीकांतची (मनोज वाजपेयी) पत्नी सुची (प्रियामणी) आणि अरविंदमधील नातं. मात्र याच नात्यासंदर्भात अरविंदची भूमिका साकारणाऱ्या मराठमोळ्या शरद केळकरने काही खुलासे केलेत. विशेष म्हणजे यामध्ये सुची असं का वागतेय याबद्दलही त्याने खुलासा केलाय.

शरद केळकरने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये सीरिजच्या काही चाहत्यांना अरविंद हाच खरा व्हिलन वाटत असल्याचं म्हटलं आहे. या शक्यतेवरुन शरदने मालिकेच्या लेखकांचं कौतुक केलं आहे. या मालिकेचं कथानक एवढ्या छान पद्धतीने लिहिलं आहे की प्रेक्षकच आता खरा व्हिलन कोण आहे यासंदर्भात तर्कवितर्क मांडू लागलेत. सीरिजचे चहाते सुचीवर नाराज आहेत. श्रीकांतचा मित्र जे. के. याच्यावरही अनेकांनी नाराजी व्यक्त केलीय असं शरदला वाटतं. यामागील कारण म्हणजे जे.के. सुचीला पाठिंबा देतोय. गुप्तचर संघटनेच्या आजूबाजूला कथानकन गुंफलेल्या या मालिकेमध्ये श्रीकांत आणि सुचीचं अडचणीत सापडलेलं लग्न हा विषय समांतर पद्धतीने हाताळण्यात आलाय.

नक्की पाहा >> Photos: ‘फॅमेली मॅन २’ मधील बोल्ड सीन्स चर्चेत; ‘राजी’च्या भूमिकेवर चहाते फिदा

“उदाहरण घ्यायचं झालं तर ऑप्रेशन जुल्फीकारचं घेता येईल. पहिल्या भागातील या हल्ल्याचा कट रचण्यामागे अरविंद असल्याचं अनेकांना वाटतंय. माझं पात्र मालिकेमध्ये का घेण्यात आलं आहे, याबद्दल अनेक शक्यता व्यक्त केल्या जात आहेत. अरविंदचा खरा चेहरा लवकरच समोर येईल दो दहशतवादी आहे, अशा अनेक शक्यता मागच्या भागाच्या वेळेस व्यक्त करण्यात आल्या. मला हे लेखकांचं यश वाटतं. त्यांनी हे कथानक फार सुंदर पद्धतीने लिहिलं आहे,” असं शरदने बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटलं आहे.

“लोक एवढ्या शक्यता आणि शंका व्यक्त करत आहेत म्हणजे ते सीरिजमध्ये पूर्णपणे गुंतलेले आहेत. त्यांना या मालिकेतील पात्रांबद्दल आपलेपणा वाटतो. जर तुमच्या प्रेक्षकांना असं वाटतं असेल तर तुमची कलाकृती उत्तम आहे,” असं शरद म्हणतो.

नक्की पाहा >> समजून घ्या : ‘The Family Man 2’ ला तमिळ लोकांकडून का होतोय विरोध?

सीरिजच्या दुसऱ्या भागामध्ये सुची विचित्र वागण्यामागील कारण तिच्या आणि अरविंददरम्यान लोणावण्यात घडलेला प्रकार कारणीभूत असल्याचं शरदने म्हटलं आहे. मात्र या दोघांमध्ये नक्की काय घडलं हे गुपित दुसऱ्या भागातही उघड करण्यात आलेलं नाही.  ‘द फॅमेली मॅन टू’ या मालिकेची निर्मिती आणि लेखन तसेच दिग्दर्शन राज निदिमोरु आणि कृष्णा डिके यांनी केलं आहे. या मालिकेचा तिसरा भागही येणार असून त्याची कथा तयार असल्याची माहिती मनोज वाजपेयीने दिलीय. मात्र तिसरा भाग येण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी लागेल असंही त्याने म्हटलं आहे.