तारांकितांच्या सगळ्याच गोष्टी चर्चेत असतात. त्यांच्या पडद्यावरच्या वावरापासून ते त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यापर्यंतच्या सगळ्याच गोष्टींवर कायम एक नजर असते. तुम्ही तारांकित आहात, यशस्वी आहात, मग तुम्हाला या नजरा, कौतुक आणि टीका एकाच पद्धतीने झेलता आली पाहिजे. आपल्यावर सतत कोणाची तरी नजर असणं, आपल्या व्यावसायिक – वैयक्तिक आयुष्याची तुलना होत राहणं हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे हे मान्य करायला हवं, अशा आशयाच्या तारांकितांच्या पोस्ट्स समाजमाध्यमांवर गेले काही दिवस फे र धरत आहेत. अर्थात याला कारणही तसंच आहे. बॉलीवूडचा बादशाह म्हणून ज्याचा उल्लेख के ला जातो त्या शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान याला ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली. आर्यनचं चौकशी सत्र आणि त्याबरोबरीने त्याचे आईवडील, बहीण सुहाना खान, एवढंच नाही तर अन्य आघाडीच्या कलाकारांच्या मुलांबाबतही समाजमाध्यमांवर वेगवेगळ्या पद्धतीने चर्चा सुरू झाली आहे.

आर्यन खानच्या मोबाइलवरील संदेशांच्या देवाणघेवाणीमुळे अभिनेत्री अनन्या पांडेही चौकशीच्या फे ऱ्यात सापडली आहे. अनन्याचा दोन वर्षांपूर्वीच बॉलीवूडप्रवेश झाला आहे, तिची कारकीर्द अजून धड मार्गीही लागलेली नाही, मात्र त्याआधीच ती या ड्रग्ज प्रकरणात चर्चेत आली आहे. सध्या या प्रकरणामुळे अनन्याच काय अन्य बॉलीवूड कलाकारांच्या मुला-मुलींविषयीही वेगवेगळ्या पद्धतीने चर्चा सुरू झाल्या आहेत. आर्यनला अटक होताच सुपरस्टार अक्षय कुमारचा मुलगा आरव पहिल्यांदा चर्चेत आला. तोही या क्रुझ ड्रग्ज प्रकरणात सामील असल्याची चर्चा सुरू झाली. लगोलग आरवची आई ट्विंकल खन्नाला समाजमाध्यमावरून त्याचे आणि तिचे एकत्रित छायाचित्र पोस्ट करून तो या सगळ्यापासून कसा दूर आहे हे दाखवून द्यावं लागलं. खरं तर बॉलीवूडमधील या आघाडीच्या फळीतील सगळ्याच कलाकारांची मुलं आता मोठी झाली आहेत आणि आज ना उद्या आईवडिलांच्या पावलावर पाऊल टाकत चित्रपट क्षेत्रात येण्याची तयारी करत आहेत. त्यामुळे एरव्हीही ही मंडळी कायम चर्चेत असतात, मात्र प्रसिद्धीच्या या झळा कशा लागतात याची प्रचीती असल्यानेच की काय अजूनपर्यंत आर्यन खानसह आरव कु मार, सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम खान, आमिरचा मुलगा जुनैद खान, सुनील शेट्टीचा मुलगा अहान ही मंडळी प्रसिद्धीमाध्यमांपासून दूर राहणंच पसंत करत होती. त्या तुलनेत सारा अली खान, जान्हवी क पूर, सुहाना खान, इरा खान, जॅकी श्रॉफची कन्या कृष्णा श्रॉफ, अजय-काजोलची मुलगी न्यासा ही मुलींची फौज कायमच समाजमाध्यमांवरील त्यांची छायाचित्रं – पोस्ट्स यामुळे चर्चेत असतात. त्यांच्या पोस्ट्स आणि छायाचित्रांमधूनच क्वचितप्रसंगी इंडस्ट्रीतील इतर तारांकितांच्या मुला-मुलींबरोबर असलेले आपापसातील नातेसंबंधांची झलक पाहायला मिळते. यामुळेच की काय, आर्यन खानच्या अटकेनंतर अमिताभ बच्चन यांची नात नव्या नंदाशी असलेली आर्यनची मैत्री, बहीण सुहाना आणि तिच्या मैत्रिणी अशा अनेक गोष्टी आणि व्यक्ती अचानक चर्चेत आल्या.

 या घटनेअगोदर साधारण वर्षभरापूर्वी सैफ अली खानची मुलगी आणि तरुणाईच्या गळ्यातली ताईत असलेली अभिनेत्री सारा अली खानचा संबंध सुशांत सिंग राजपूत आत्महत्येनंतर बाहेर पडलेल्या ड्रग्ज प्रकरणाशी जोडला गेला. एकामागून एक घडणाऱ्या या सगळ्या घटनांमधून सध्या तारेतारकांच्या मुलांनाच का लक्ष्य के लं जातंय, असा प्रश्नही उपस्थित होऊ लागला आहे. तारांकितांची ही नवी पिढी बॉलीवूडमध्ये उतरण्याच्या तयारीत असतानाच त्यांच्याविषयी एक तर ड्रग्ज, पाट्र्या किंवा त्यांचे प्रेमसंबंध याविषयी चर्चा होऊ लागली आहे. पडद्यावर यशस्वी ठरलेले हे कलाकार पालक म्हणून सपशेल अपयशी ठरले आहेत, अशी टीका होऊ लागली आहे. त्यांच्या पालकत्वावर प्रश्न उमटले आहेत. त्यावरही खंबीरपणे उत्तरं देण्याचा प्रयत्न अनेक कलाकारांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेला दिसतो. मात्र एकू णच या सगळ्या प्रकरणामुळे नव्या पिढीभोवतीचे चर्चेचे वलय सुटायचे काही नाव घेत नाही हेच जाणवत राहते.

समाजमाध्यमांमुळे तारेतारकांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल असलेले सर्वसामान्यांचे आकर्षण अधिकच वाढले आहे. संबंधित कलाकारांचे फॅ न्स क्लबही यात आपापल्या परीने भर घालत असतात. या सतत चर्चेत राहण्याच्या प्रक्रियेमुळे त्यांची प्रसिद्धी सहज होते, किं बहुना त्यांच्या प्रसिद्धीसाठी जाणूनबुजून असं नाट्य घडवलं जातं, अशीही टीका अनेकदा होते. सुशांत सिंग राजपूत प्रकरणातही अनेक कलाकारांच्या मुलांना घराणेशाहीच्या टीकेला सामोरं जावं लागलं. तेव्हापासून त्यांच्याभोवती असलेला चर्चेचा हा फार्स दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. आर्यन, सुहाना, इब्राहिम खान असो वा अनन्या पांडे… या मंडळींविषयी त्यांच्या बॉलीवूड प्रवेशाबद्दलच्या चर्चा रंगायच्या होत्या. प्रत्यक्षात गेल्या वर्षीपासून ड्रग्ज आणि पाट्र्या यासंदर्भातून यातले काही जण प्रसिद्धीच्या झोतात आले आहेत. समाजमाध्यमांवर सक्रिय असणाऱ्या या कलाकारांच्या नव्या पिढीला त्यांच्या चाहत्यांकडून तशाच रोखठोक प्रेमाला सामोरं जावं लागत आहे हेही तेवढंच खरं…!