‘राजश्री प्रॉडक्शन’ने बॉलिवूडला बरेच सुपरहिट चित्रपट दिले. या कौटुंबिक चित्रपटांमध्ये असेही काही कलाकार होते, ज्यांनी स्वत:च्या भूमिकेला योग्यप्रकारे न्याय दिला आणि आजही प्रेक्षक त्यांना विसरू शकले नाहीत. त्यापैकीच एक कलाकार म्हणजे मोहनीश बहल. ‘हम आपके है कौन?’, ‘हम साथ साथ है’ या चित्रपटांमध्ये त्याने साकारलेल्या व्यक्तिरेखांचे प्रचंड कौतुक झाले. मात्र, चांगली कामगिरी करूनसुद्धा आपल्याला आता काम मिळत नसल्याची खंत मोहनीशने ‘आयएएनस’ला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केली.
मोहनीशने म्हटले की, ‘मी चित्रपटांमध्ये काम करणं कमी केलं असं अनेकांना वाटतं. पण असं काहीही नाही. मला स्वतःला काम करण्याची इच्छा आहे. पण मला कामच मिळत नाहीये. सध्या माझ्याकडे खूपच कमी ऑफर्स येत आहेत. पण कमी ऑफर्स येत असल्याने कोणतीही भूमिका स्वीकारायचं, हे मला पटत नाही. त्यामुळे चांगली भूमिका मिळाल्याशिवाय काम करायचं नाही, असं मी ठरवलं आहे.’
मोहनीश २०१० पासून खूपच कमी चित्रपटांमध्ये झळकला. ‘क्रिश’ आणि ‘जय हो’ वगळता कोणत्याही मोठ्या बजेटच्या चित्रपटात त्याने भूमिका साकारली नाही. २०१४ नंतर तो रुपेरी पडद्यापासून लांबच आहे. सलमान खानच्या ‘मैंने प्यार किया’ या चित्रपटात त्याने साकारलेल्या नकारात्मक भूमिकेचे प्रेक्षकांनी कौतुक केले होते. त्यानंतर ‘हम आपके है कौन’मध्ये पहिल्यांदाच त्याला सकारात्मक भूमिका साकारण्याची संधी मिळाली आणि त्याने त्याचे सोने केले. चित्रपटांशिवाय ‘दिल मिल गए’ आणि ‘कुछ तो लोग कहेंगे’ यांसारख्या मालिकांमध्ये त्याने साकारलेल्या भूमिका प्रेक्षकांना आजही लक्षात आहेत.