करोना व्हायरसमुळे अनेक मालिका आणि चित्रपटांचे चित्रीकरण पुढे ढकलण्यात आले होते. पण लॉकडाउननंतर आता हळूहळू अनलॉक केल्यानंतर राज्य सरकारने चित्रीकरणास परवानगी दिली आहे. त्यासाठी काही नियमही आखण्यात आले आहेत. पण आता छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘शक्ति : अस्तित्व के एहसास की’ मधील एका अभिनेत्रीने मालिका सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

‘शक्ति : अस्तित्व के एहसास की’ मालिकेतील गौरीने मालिका सोडल्याचे इन्स्टाग्रामवर भावूक पोस्ट करत सांगितले आहे. ‘मला मालिकेतील माझी परमीत ही भूमिका प्रचंड आवडत होती. शक्ति या मालिकेमुळे मला प्रचंड प्रेम मिळाले. मी माझ्या टीमला मिस करते. पण सध्या परिस्थिती अशी आहे की मला हा निर्णय घ्यावा लागला. हा निर्णय घेण्यापूर्वी मला कित्येक दिवस रात्री झोप लागली नाही. कलर्स टीव्हीने मला समजून घेतले त्याबद्दल त्यांचे आभार’ असे तिने पोस्टमध्ये म्हटले आहे.

गौरीने मालिकेत परमीत सिंहची भूमिका साकारली होती. कुटुंबाच्या सुरक्षेसाठी गौरीने हे पाऊल उचलले आहे. ती सध्या कुटुंबीयांसोबत हरियाणामध्ये आहे. मुंबईमधील करोनाचा वाढता फैलाव पाहून मुंबईत सध्या परत न येण्याचा निर्णय घेतला आहे.