मंगळवारी सकाळपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईचं जनजीवन विस्कळीत झालं होतं. या पावसामुळे २६ जुलैच्या आठवणी जागा झालेल्या. अशातच अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मुंबईकरांना काळजी घेण्याचा इशारा दिलेला. परिणीती चोप्रा, दिया मिर्झा, दीपिका पदुकोण, सोनाक्षी सिन्हा या कलाकारांनी ट्विट करत परिस्थितीविषयी चिंता व्यक्त केलेली. तर बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनीसुद्धा काही ट्विट केले. मात्र बिग बींच्या या ट्विट्समुळे काही नेटीझन्स नाराज झाले.

मुंबईकरांना काळजी घेण्याविषयी, पोलिसांच्या कामगिरीचे स्तुतीपर ट्विट करत असतानाच बिग बींनी केलेल्या दोन-तीन ट्विट्समुळे नेटीझन्स नाराज झाले. मुंबईत मुसळधार पावसामुळे जागोजागी पाणी साचलं होतं. अशातच एकाचा विनोद अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवर पोस्ट केला. ‘मुंबईत रिअल इस्टेटच्या किंमतींनी उच्चांक गाठला आहे. आता प्रत्येक इमारतीला समुद्रकिनारा लाभला आहे- प्रसून पांडे,’ असं त्यांनी ट्विट केलं. अनेक मुंबईकर अडचणीत असताना त्यांना विनोद पोस्ट करणं कसं सुचतंय, असा प्रश्न काही नेटीझन्सनी केला.

वाचा : ‘लग्नापूर्वी शारीरिक संबंध ठेवण्यात गैर काय?’

‘रस्त्यांवर पाणी साचलंय, सामान्य मुंबईकर या परिस्थितीत एकमेकांना मदत करत आहेत. यादरम्यान ढोल-ताशांच्या गजरात ‘विसर्जन’ मात्र सुरु आहे…अप्रतिम मुंबई!’ असंही त्यांनी एक ट्विट केलं. तर अमेरिकेत आलेल्या चक्रीवादळाचा उल्लेख करत त्यांनी निसर्गाला दोष न देण्यासंदर्भातही ट्विट केलं. ‘निसर्गाशी लढू नका. निसर्गाला दोष देऊ नका. जगातील सर्वात बलाढ्य राष्ट्र ‘हार्वे’ चक्रीवादळाला कशाप्रकारे सामोरं जात असेल?’, असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले. बिग बींच्या या ट्विटवर नाराज होत पाऊस आणि चक्रीवादळातील फरक तुम्हाला माहित आहे का, असा प्रश्न काही नेटीझन्सनी विचारला. तर काहींनी इंटरनेट बंद करुन त्यांना झोपण्याचाही सल्ला दिला.