"भेटली तू पुन्हा" या चित्रपटाचा "भेटली ती पुन्हा 2" हा सिक्वेल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. "भेटली तू पुन्हा" हा चित्रपट २८ जुलै २०१७ रोजी प्रदर्शित झाला होता. आज या चित्रपटाला चार वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून निर्मात्यांनी या चित्रपटाच्या सिक्वेलची घोषणा नुकतीच सोशल मीडियावर केली आहे . त्यामुळे अभिनेता वैभव तत्ववादी आणि अभिनेत्री पूजा सावंत ही जोडी पुन्हा एकत्र येणार आहे. गिरीश परब, आकाश पेंढारकर, सचिन नारकर आणि विकास पवार हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. तर "भेटली ती पुन्हा 2" या सिक्वेलद्वारे आजवर अनेक मालिकांचे दिग्दर्शन केलेले सुप्रसिद्ध दिग्दर्शक जयंत पवार हे सिनेदिग्दर्शक म्हणून या चित्रपटाद्वारे पदार्पण करत आहेत. "भेटली तू पुन्हा" हा चित्रपट लिहिणारे संजय जमखंडी "भेटली ती पुन्हा 2" चे लेखन करत आहेत. View this post on Instagram A post shared by VAIBHAV TATWAWADI (@vaibhav.tatwawaadi) अतिशय हलकीफुलकी कथा, वैभव तत्ववादी, पूजा सावंत यांचा नैसर्गिक अभिनय, उत्तम दिग्दर्शन आणि तांत्रिक बाजू, "हरवू जरा..", "जानू जानू.." अशी उत्तमोत्तम गाणी यांचा मिलाफ "भेटली तू पुन्हा" या चित्रपटात झाला होता. प्रेक्षकांचा या चित्रपटाला उत्तम प्रतिसादही लाभला होता. आता सिक्वेल होताना चित्रपटाच्या कथेने काय वळण घेतले आहे हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे.