ज्येष्ठ अभिनेते श्रीराम लागू यांचं निधन झाल्याची बातमी समोर आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांची प्रकृती फारशी चांगली नव्हती. ‘सामना’, ‘सिंहासन’, ‘पिंजरा’ यासारख्या अनेक सिनेमांमध्ये त्यांनी काम केलं होतं. ‘नटसम्राट’ या नाटकातली त्यांची अप्पासाहेब बेलवलकर ही भूमिका विशेष गाजली. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मागील आठवड्यात तन्वीर सन्मान सोहळा झाला होता. त्याची सुरुवात श्रीराम लागू यांनीच केली होती. या कार्यक्रमाला डॉ. श्रीराम लागू हजर होते. हा त्यांचा शेवटचा कार्यक्रम ठरला. तन्वीर हा त्यांचा मुलगा होता त्याचं निधन झाल्यानंतर डॉ. लागू यांनी त्याच्या नावाने पुरस्कार सुरु केला होता.

डॉ. श्रीराम लागू यांचा जन्म १६ नोव्हेंबर १९२७ रोजी सातारा येथे झाला होता. त्यांनी १९६९ मध्ये त्यांच्या नाट्य कारकिर्दीला सुरुवात केली होती. डॉ. लागू यांनी नाट्यक्षेत्र आणि सिनेक्षेत्रात त्यांच्या अभिनयाने वेगळा ठसा उमटवला होता. रंगभूमीचं चालतंबोलतं विद्यापीठ अशी ओळख असणारे श्रीराम लागू काळाच्या पडद्याआड निघून गेले आहेत.

अत्यंत अभ्यासू आणि विचारी नट अशी त्यांची ओळख होती. मराठी रंगभूमीवरचं नटसम्राट हे नाटक त्यांच्यासाठी लिहिलं गेलं होतं. त्यांनी जागतिक रंगभूमीची ओळख मराठी रंगभूमीला घडवली. घाशीराम कोतवाल, सखाराम बाईंडर या नाटकांना जेव्हा विरोध होत होता, त्यावेळी त्यांनी खंबीर अशी भूमिका घेतली आणि तेअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बाजूने उभे राहिले.

सुबोध भावे म्हणतात..

सर्वार्थाने मोठा अभिनेता, रंगकर्मी आणि आमचे आदर्श श्रीराम लागू गेले याचं अतीव दुःख झालं अशी प्रतिक्रिया अभिनेते सुबोध भावे यांनी दिली. नाटकांवर प्रेम करणारा माणूस हरपला याचं दुःख होत असल्याचंही सुबोध भावे यांनी म्हटलं आहे.

सुमीत राघवन म्हणतात… 

डॉ. श्रीराम लागू हे हॅम्लेट पाहण्यासाठी आले होते. त्यांनी तीन तास ते नाटक पाहिलं त्यानंतर मला आशीर्वाद दिले त्यामुळे मी भरुन पावलो असं अभिनेते सुमीत राघवन यांनी म्हटलं आहे. सुमीत राघवन यांनी ‘… आणि काशीनाथ घाणेकर’ या सिनेमात श्रीराम लागूंची भूमिका साकारली होती. या भूमिकेआधी त्यांनी श्रीराम लागू यांची भेटही घेतली होती.