दिग्दर्शक विकाल बहलने त्याचे सहकारी दिग्दर्शक अनुराग कश्यप व विक्रमादित्य मोटवानी यांना नोटीस बजावली आहे. या दोघांनी आपल्याविरोधातील ट्विट डिलीट करून सोशल मीडियावर विनाशर्त माफी मागावी, असे या नोटीशीत म्हटले आहे. विकास बहल, अनुराग कश्यप, विक्रमादित्य मोटवानी आणि मधू मंटेना हे चौघे ‘फँटम फिल्म्स’ या बॅनरअंतर्गत एकत्र काम करायचे. पण विकासवर एका महिलेने आणि अभिनेत्री कंगना रणौतने लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप केल्यानंतर ‘फँटम फिल्म्स’ ही निर्मिती संस्था बंद करण्यात आली.

‘विकास बहलच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचेल असे काही विधान भविष्यात करू नये आणि तसे केल्यास कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल,’ असे नोटीशीत म्हटले गेले आहे. इतकेच नव्हे तर अनुराग कश्यप आणि विक्रमादित्य मोटवानी यांनी व्यावसायिक ईर्ष्येतून आरोप केले असून माझे करिअर उद्ध्वस्त करण्याचा एकमेव हेतू त्यामागे होता, असेदेखील त्यात म्हटले आहे.

#MeToo : आरोपांच्या धास्तीने आलोक नाथ यांची प्रकृती बिघडली

अनुरागने ट्विटरच्या माध्यमातून विकास बहलवर आरोप केलेल्या महिलेची माफी मागितली होती. ‘विकास बहलने पीडित कर्मचारी महिलेसोबत जे कृत्य केले त्याची मला माहिती होती. मात्र, तरीही कंपनीच्या धोरणांनुसार आपण या प्रकरणात कायदेशीररित्या काहीही करु शकलो नाही. मात्र, तरी वैयक्तिकरित्या त्या पीडित महिलेला माझ्याकडून जितकी होऊ शकेल तितकी मदत मी केली,’ असे त्याने या पोस्टमध्ये लिहिले होते.