छोट्या पडद्यावरील लोकप्रिय क्विझ शो ‘कौन बनेगा करोडपती १४’ चा (Kaun Banega Crorepati 14) नवा एपिसोड प्रदर्शित झाला आहे. या एपिसोडमध्ये गुजरातचा विमल कांबद तब्बल ५० लाख रुपयांच्या प्रश्नापर्यंत पोहोचला, पण तो पुढे जाऊ शकला नाही. होस्ट अमिताभ बच्चन यांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे देऊन विमलने २५ लाखांची रक्कम जिंकली, मात्र ५० लाखांच्या प्रश्नावर तो अडकला आणि त्याने खेळ सोडण्याचा निर्णय घेतला. २९ वर्षीय विमल गुजरात उच्च न्यायालयात शिपाई म्हणून काम करतो.

हेही वाचा – KBC मध्ये एक कोटी रुपयांसाठी स्पर्धकाला विचारण्यात आला ‘हा’ प्रश्न; तुम्हाला उत्तर माहितीये का?

५० लाखांच्या प्रश्नात अडकल्यानंतर विमलने ‘व्हिडिओ कॉल अ फ्रेंड’ या लाइफलाइनचा वापर केला, पण मित्राने दिलेल्या उत्तराने त्याचे समाधान झाले नाही, म्हणून त्याने खेळ सोडण्याचा निर्णय घेतला. त्याच्यावर ९ लाख रुपयांचं कर्ज असल्याचं विमलने शोमध्ये सांगितले होतं. याबद्दल सांगताना तो भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. तसेच जिंकलेल्या पैशातून कर्ज फेडणार असल्याचे त्याने सांगितले.

हेही वाचा – “आपण चुकीचा चित्रपट…”; बॉयकॉट ट्रेंडनंतर ‘लाल सिंग चड्ढा’ फ्लॉप झाल्याबद्दल आर. माधवनने मांडलं स्पष्ट मत

विमलने सर्व प्रश्नांची उत्तरं मोठ्या आत्मविश्वासाने दिली. पण ज्या प्रश्नावर विमल अडकला तो प्रश्न नेमका काय होता, ते जाणून घेऊयात. तर, “यापैकी कोणते भारतरत्न विजेते भारताबाहेर दुसऱ्या देशात जन्मले आणि मरण पावले?” असा तो प्रश्न होता. याच्या उत्तरासाठी लाल बहादूर शास्त्री, मौलाना अबुल कलाम आझाद, मदर तेरेसा आणि जेआरडी टाटा हे चार पर्याय देण्यात आले होते. याचं बरोबर उत्तर जेआरडी टाटा होतं, पण विमलला उत्तर माहित नव्हतं म्हणून त्याने शो सोडला.

हेही वाचा – साऊथच्या ‘या’ सहा चित्रपटांशिवाय कोणते चालले? आर माधवनने उपस्थित केला सवाल

अभिनेते अमिताभ बच्चन मागच्या १३ वर्षांपासून हा शो सातत्याने होस्ट करत आहेत. ते दरवर्षी हा शो का होस्ट करतात, याबद्दल त्यांनी ‘द इंडियन एक्सप्रेस’शी बोलताना सांगितलं होतं. प्रेक्षक आणि स्पर्धकांचं प्रेम आणि आपुलकी माझी शक्ती आहे. त्यांच्या प्रेमामुळेच मी दरवर्षी हा शो होस्ट करतो, असं बिग बी म्हणाले होते. ‘कौन बनेगा करोडपती-१४’ हा शो सोमवार ते शुक्रवार रात्री ९ वाजता सोनीवर प्रसारित होतो.